आता पुन्हा ‘लँडिंग’
या शहराला नेमके काय झाले आहे? असा सवाल सध्या नाशिककरांना सतावतो आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेस अनुसरून नाशिकचा समावेश ‘उडान’ योजनेत करण्यात आला. त्यात नाशिक ते मुंबई, पुणे-हैद्राबाद, अहमदाबाद अशा भारताच्या विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या या विमानसेवेला आता पुन्हा ग्रहण लागले आहे. कारण, नाशिक-मुंबई विमानसेवा आता पुन्हा बंद करण्यात आली आहे. नाशिक ते मुंबई या दोन्ही शहरांमधील हवाई अंतर १५० किमी पेक्षा कमी असल्याने ‘उडान’ योजनेचा लाभ या सेवेसाठी देता येणार नसल्याचे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासासाठी प्रवाशांना दोन ते अडीच हजार रुपये इतके भाडे मोजावे लागेल. या धोरणामुळे आणि केवळ तीन ते चार तास अंतरावरील रस्ता प्रवासासाठी इतके मूल्य का अदा करायचे? या व्यावहारिक विचारामुळे या सेवेला प्रतिसाद मिळणार नाही, या जाणीवेतून ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. मुळात नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा, औद्योगिक प्रगतीकडे आता कुठे वाटचाल होत आहे. साहाजिकच आहे की, या शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांमध्ये मजूरवर्गाचा वाटा हा मोठा असणार. पण, त्याला विमानसेवा परवडणारी आहे का? याचा विचार करावयास हवा. आधी म्हटल्याप्रमाणे कृषिप्रधान जिल्हा असल्याने प्रवासी वाहतुकीऐवजी मालवाहतुकीला प्राधान्य देणारी विमानसेवा सुरू केल्यास आणि तिला चालना मिळेल, असे धोरण आखल्यास नाशिक भारताच्या हवाई नकाशावर पुन्हा झळकेल. नाशिकनगरीत विदर्भवासीयांचा रहिवास मोठा आहे. तसेच विदर्भातील नागपूर येथे जाण्यासाठी रस्तेमार्गे १८ ते २२ तास लागतात आणि लोहमार्गाने सेवाग्राम, विदर्भ, गीतांजली अशा काही मोजक्याच रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. त्यांनाही १२ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तेव्हा हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुंबई आणि पुण्यापेक्षा विदर्भासाठी विमानसेवा सुरू केल्यास त्याला नक्कीच प्रतिसाद मिळेल. तसेच, नाशिकनगरी ते अलाहाबादनगरी अशी दोन तीर्थस्थळे, गंगा ते दक्षिण गंगा अशी धार्मिक परिक्रमा करणारी विमानसेवा सुरू केल्यास त्यालाही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. नगरीतील लोकप्रतिनिधींनी केवळ धावत्याच्या मागे न धावता चौकटीबाहेरचा विचार करून नाशिक विमानसेवेचे लँडिंग होणार नाही, यासाठी प्रयत्न करावयास हवे.