आपल्या भारतात बालकाच्या नामकरण विधीप्रसंगी इतिहासकालीन महापुरुषाच्या नावाने बालकाचे नाव ठेवण्याची प्रथा आहे. विविध संत, महात्मे, राजे, नदी अशा विविध लोकांशी, घटकांशी साधर्म्य असणारी नावे आपल्याकडे पाहावयास मिळतात. हेतू एवढाच असतो की, त्या सत्पुरुषाचे गुण आपल्या अपत्यात यावे व भविष्यात त्याने तसे वर्तन करावे. हाच सद्हेतू ठेऊन नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचेही नामकरण झाले असणार. मात्र, नावातील ‘तुकाराम’ त्यांच्या कार्यपद्धतीत का अवतरत नाही, हाच मोठा प्रश्न. तीर्थनगरी नाशिकचे आयुक्तपद मुंढेंना मिळाले. तेव्हा स्वाभाविक आहे की, नाशिकमध्ये धार्मिक सण, उत्सव यांचे स्तोम असणार याची जाणीव त्यांना असावी. मात्र, त्यांनी कारभार स्वीकारल्यापासून धार्मिक कार्याला विरोधच केल्याचे चित्र नाशिककर पाहात आहेत. संत निवृत्तीनाथ यांच्या पालखीचे स्वागत गेली अनेक वर्षं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात केले जाते. मात्र, यावेळेस पालखीच्या स्वागताला महापालिका खर्च करणार नाही, अशी भूमिका मुंढे यांनी मांडली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंतर देखावा म्हणून पालखीच्या चरणी मुंढे लीन झाले. त्यामागची दांभिकता सर्वांनीच पाहिली.
मुंढे यांनी कारभार सुरू केला तेव्हा, पालिकेतील सर्व देवीदेवतांच्या तसबिरी हटविण्याचे फर्मान त्यांनी काढले. त्यामुळे पालिका कर्मचार्यांमध्ये मोठा रोष दिसून आला. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक चेहरा असतो आणि तेथे संपन्न होणारे उत्सव हे त्या शहराचे एक भावविश्व असते. गणेशोत्सव हा त्याचाच एक भाग. शहरातील नव्हेे, तर संपूर्ण जिल्ह्यातील लोक गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी येतात ते भालेकर मैदानावर. मात्र, या वेळेस वाहनतळाचे काम सुरू असल्याचे कारण देत तुकाराम मुंढे यांनी गणेशमंडळांना भालेकर मैदानावर देखावे साकारण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या आगमनात आणि त्याच्या सौंदर्यात विघ्न येते कीकाय, अशी स्थिती नाशिकमध्ये पाहावयास मिळत आहे. यावर मल्लिनाथी जोडताना मुंढेंनी यंदा देखावे तपोवनात साकारण्याचा उरफाटा सल्लाही दिला. तपोवन तसे शहराच्या बाजूला. शहरातील लोकांचे ठीक आहे, पण जिल्ह्यातील लोक हे देखावे तपोवनात कसे पाहणार, त्यांना किती त्रास होईल, याचा विचार आयुक्तांनी करावयास हवा होता. त्यामुळे नावात ‘तुकाराम’ असूनही मुंढे यांना आध्यात्मिक कार्याची ऍलर्जी का? असा सवाल नाशिककरांना भेडसावत आहे.
आपण बोध कधी घेणार?
सध्याचे युग हे जाहिरातींचे युग. उत्पादनांची जाहिरात केल्याशिवाय त्याचा खप नाही, हे आपण सगळेच जाणतो. भारतासारख्या लोकसंख्येने समृद्ध असणार्या देशात जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या काळजाचा ठाव घेणारी जाहिरात साकारण्याकडे अनेक उत्पादकांचा कल आपल्याला दिसून येतो. मात्र, सध्या जाहिरातींसाठी अर्धनग्न महिला, पुरुष प्रसंगी लहान बालके यांचा वापर सर्रासपणे होत असल्याचे आपण दूरचित्रवाहिनी संचावर पाहत असतो. मात्र, ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळख असणार्या जपानी कंपनी ह्युंदाईने इतर अनेक बाबींप्रमाणे जाहिरात क्षेत्रातही आपली वेगळी विचारधारा व्यक्त केली आहे. सध्या समाजमाध्यम आणि युट्युबवर ‘एका’ कारची जाहिरात पाहावयास मिळते. "अपना तो क्लिअर है जी, जो देश की ड्युटी करे, उसकी ड्युटी सबसे पहले", या पंचलाईनवर आधारित असणारी ही जाहिरात देशभक्तीचे एक अनोखे उदहरण आहे. भारतीय जनमानस आणि भारतीयांच्या मनात असणारी देशभक्ती याची जाण ठेऊन ही जाहिरात बनवली आहे. त्यात असणारा कारगिलचा उल्लेख हा जाहीरात कर्त्याने भारतीय मनाचा किती खोलवर अभ्यास केला आहे, हे सांगण्यास पुरेसा आहे. भारतीयांच्या मनात सरकारी नोकरीचे असणारे महत्त्वदेखील त्यात नमूद आहे. नोकरीपेक्षा देशसेवेला महत्त्व देणारा तरुण हा भारतीयच असू शकतो, ही विचारधारा आपल्याला या जाहिरातीतून दिसून येते.
या सर्व रचनेमुळे एक दिसून येते की, मूळची भारतीय नसणारी कार कंपनी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करताना भारतीय समाजाचा किती अभ्यासपूर्ण विचार करते. मात्र, आजमितीस पुरुषांच्या दाढीच्या सामग्रीच्या जाहिरातीतही अर्धनग्न महिला दाखविण्यात धन्यता मानली जाते. संपूर्ण कपड्यांसह, पूर्ण पुरुष व्यक्तिरेखा साकारात केलेली जाहिरातदेखील समाजमनाचा वेध घेऊ शकते, हे या जाहीरातीने दाखवून दिले आहे. उत्पादन विक्रीसाठी कुटुंबीयांसमवेत पाहता येणार नाही, अशा प्रकारच्या जाहिराती साकारणे म्हणजे आधुनिकता यास यामूळे छेद गेला आहे. जगाला आधुनिकतेची दैनंदिन स्वरूपात ओळख करून देणारी कंपनी किती हटके आणि सुयोग्य विचार करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही जाहिरात आहे. सवाल हाच आहे की, यातून आपण कधी बोध घेणार आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण थांबवून भारतीय विचार दर्शनास कधी चालना देणार?