शबरीमलै : ‘रेडी टू वेट’ अभियान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
शबरीमलै मंदिरात विशिष्ट वयाच्या महिलांना प्रवेशबंदीवरून सध्या भारतातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. कथित स्त्रीवादी मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली असून तिथे युक्तिवाद अंतिम टप्प्यात आहे. या युक्तिवादात ‘पीपल फॉर धर्मा’ संस्थेचे वकील जे. साई दीपक यांनी जे प्रतिपादन केले, त्याने सर्वोच्च न्यायालयदेखील प्रभावित झाले आणि आम्हाला बर्याच नव्या गोष्टी समजल्या, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. या पीपल फॉर धर्माच्या अध्यक्षा शिल्पा नायर यांची एक मुलाखत ‘हिंदुपोस्ट’ वेबपोर्टलवर प्रकाशित झाली आहे. ती वाचल्यावर शबरीमलै प्रकरणातील सर्व शंका दूर होतील, अशी आशा आहे.
 
हिंदू धर्माच्या काही डोळस महिला भक्तांनी काही महिन्यांपूर्वी ‘रेडी टू वेट’ (थांबण्यास तयार) नावाचे एक ऑनलाईन अभियान सुरू केले. शबरीमलै मंदिरात प्रवेशासाठी वयाची पन्नाशी गाठेपर्यंत थांबण्यास आम्ही तयार आहोत, अशी इच्छा प्रदर्शित करणार्या भारतातील लाखो महिलांनी या अभियानात सहभागी होऊन, हिंदू धर्मावर कावळ्यांप्रमाणे तुटून पडणार्या बुद्धिवाद्यांना चकित केले. या अभियानाच्या एक प्रवर्तक शिल्पा नायर होत्या. शास्त्रीय संगीत आणि नृत्यात प्रावीण्यप्राप्त शिल्पा नायर या मूळ केरळच्या असून सध्या दुबईत उद्योजिका म्हणून प्रतिष्ठित आहेत. ‘रेडी टू वेट’ अभियान सुरू करण्यामागची भूमिका सांगताना शिल्पा नायर म्हणाल्या की, मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, शबरीमलै मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा म्हणून ‘राईट टू प्रे’ (पूजेचा अधिकार) नावाचे एक ऑनलाईन अभियान सुरू करण्यात आले. हाजी अली दर्गा आणि शबरीमलै यांची तुलना म्हणजे संत्री व सफरचंद यांची तुलना करण्यासारखी आहे. कारण, दोन्ही ठिकाणच्या पूजापद्धती, ईश्वराच्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आहेत. तसेही, शबरीमलै येथील परंपरा महिलांना संपूर्ण प्रवेशबंदीची नाही. फक्त एका विशिष्ट वयाच्या महिलांनाच ही बंदी आहे. हा फरक, प्रवेशबंदीला विरोध करणार्यांनी लक्षातच घेतला नाही. त्यामुळे आम्ही ठरविले की, आमच्या परंपरांचे दुसर्यांनी रक्षण करण्याऐवजी, आम्ही महिला भक्तांनीच आता पुढे येऊन आमच्या परमेश्वराच्या आदेशाचे पालन करण्याचा संकल्प सोडला पाहिजे. त्यातूनच या ‘रेडी टू वेट’ नावाच्या अभियानाचा जन्म झाला. या मंदिरात प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही वयाची पन्नाशी गाठेपर्यंत थांबण्यास तयार आहोत, असे ठामपणे सांगणार्या लाखो भारतीय महिलांचा आम्हाला पाठिंबा मिळाला. आमच्या देवाला या उपर्या लोकांनी स्त्रीद्वेष्टा म्हणावे, हे कुणालाच रुचले नाही आणि त्यामुळे पक्षीय भेदापलीकडे जाऊन आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 
 
विशिष्ट वयातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीचे तुम्ही कसे समर्थन करता, असे विचारले असता, शिल्पा नायर म्हणाल्या- विविध मंदिरांत असलेल्या देवता वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहेत. शबरीमलै मंदिरात असलेली ही परंपरा, या मंदिरातील देवता- शास्ता (भगवान अय्यप्पा) हा ब्रह्मचर्याचे पालन करणारा कुमार आहे, या तथ्यावर आधारित आहे. इतर अय्यप्पा मंदिराहून शबरीमलै अय्यप्पा वेगळा आहे. इथे हा धर्मशास्ता म्हणून पूजिला जातो. केरळमध्ये अय्यप्पाची चार प्रमुख मंदिरे आहेत. तिथे अय्यप्पांची चार रूपे आहेत. कुलातुपुळा येथे बाल, शबरीमलै येथे ब्रह्मचारी, अचनकोविल येथे भार्यासमवेत आणि आर्यानकोवू येथे संन्यासी रूपात अय्यप्पा प्रतिष्ठित आहे. शबरीमलै, जेथे अय्यप्पा ब्रह्मचारी म्हणून प्रतिष्ठित आहे, ते सोडून बाकी तीनही, तसेच जगातील इतरही अय्यप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशाला बंदी नाही. एका विशिष्ट वयोगटातील महिलांना शबरीमलै मंदिरात प्रवेश नसण्याचे कारण अतिशय सोपे आहे. शबरीमलैच्या यात्रेकरूंना 41 दिवसांचे अत्यंत कडक ‘व्रत’ आचरायचे असते. त्याला ‘मंडल व्रत’ असे म्हणतात. मासिक पाळीमुळे महिला हे व्रत पूर्णपणे आचरण करू शकत नाही. शबरीमलै येथील अय्यप्पा हा नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळे, मंदिराच्या गर्भगृहातील शक्तीच्या प्रभावात वारंवार आल्याने, प्रजननक्षम महिलांमध्ये असलेल्या नैसर्गिक सर्जनशक्तीत असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या कुमारिका आहेत किंवा ज्यांना मोनोपॉज आला आहे, अशाच महिला ही यात्रा करू शकतात.
 
 
 
खरेतर, शिक्षित महिलांनी जुन्या परंपरांच्या विरुद्ध बंड करायचे असते, असे मानले जाते. परंतु, ‘रेडी टू वेट’ अभियानातील महिला शहरी, शिक्षित आहेत. यात तुम्हाला विरोधाभास जाणवत नाही का, असे विचारल्यावर शिल्पा नायर म्हणाल्या- नाही. ज्या परंपरा महिलांना दडपतात आणि भेदभावामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्याविरुद्ध महिलांनी नक्कीच बंड केले पाहिजे. परंतु, शबरीमलै येथे सुरू असलेली प्राचीन परंपरा, आपला सनातन धर्म ज्या वैविध्यतेच्या आधारावर उभा आहे ती जपणारी आहे. ज्यांना केरळच्या मंदिरातील विशिष्ट परंपरांचे कणभरही ज्ञान नाही, अशा काही महिलांनी म्हणावे की, समानता आणण्यासाठी या परंपरांना नष्ट करा, तर आम्हाला आमच्या धर्माने दिलेले विशिष्ट अधिकार आम्ही का म्हणून सोडावे?
 
सर्वोच्च न्यायालयातील शबरीमलै खटल्याच्या संदर्भात सांगताना शिल्पा नायर म्हणाल्या- ‘रेडी टू वेट’ अभियानाला महिलांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात भाग घेण्याचे आम्ही ठरविले. त्यासाठी आम्ही चेन्नई येथे ‘पीपल फॉर धर्मा’ ही संस्था स्थापन केली. आमची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी जे. साई दीपक हे वकील म्हणून पुढे आले आणि तिथे सुविदत्त सुंदरम् यांच्या मार्फत आम्ही मध्यस्थ (इंटरव्हेंशन) म्हणून अर्ज सादर केला. आमच्या अर्जात आम्ही नमूद केले की, श्रद्धेच्या या चर्चेत भगवान अय्यप्पा यांचे भक्तच महत्त्वाचे पक्षकार राहू शकतात. नास्तिक स्त्रीवादी, जे ‘हॅपी टू ब्लीड’ आणि ‘राईट टू प्रे’सारखे अभियान राबवून हिंदू धर्मात अस्तित्वातच नसलेल्या महिलांवरील भेदभावावर अक्कल पाजळत असतात, अशांना या चर्चेत काही स्थान नाही.
 
परंपरा आणि संस्कृतीच्या बाजूने ठाम उभे राहिल्यावरून तुम्हाला काही विरोध झाला का, यावर शिल्पा नायर म्हणाल्या- अर्थातच. प्रस्थापित विचारवंत असलेल्या कथित स्त्रीवाद्यांकडून आमच्यावर कडक टीका झाली. तथ्यांच्या आधारावर आमचे म्हणणे खोडून काढणे जमले नाही म्हणून मग ही मंडळी जातीवर घसरली. नायर जातीवर व्यंग्यचित्रे वगैरे काढण्यात आली. आमच्या अभियानाला जो अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याची या कथित स्त्रीवाद्यांना अपेक्षाच नव्हती. त्यांना वाटते की, त्यांच्या आधुनिकतेच्या आणि प्रागतिकतेच्या मार्गानेच हिंदू धर्माला पुढे नेता येईल. परंतु, हताशेमुळे त्यांनी वैयक्तिक चिखलफेक सुरू केली. परंतु, आम्ही तिकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले. कारण, आमची आमच्या धर्मावर श्रद्धा आहे आणि आमच्या कर्मानुसार आम्हाला पुढे जायचे आहे. आज आम्हा हिंदूंना तीव्र भेदभावाचा सामना करावा लागत आहे. आमच्या मंदिरांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. हा हस्तक्षेप संविधानानुरूप नाही. संविधानाने सर्वांना समान वागणूक द्यायला हवी. केवळ हिंदूंच्याच मंदिरांमध्ये हस्तक्षेप का म्हणून? माझ्या हिंदू बांधवांना माझे एवढेच सांगणे आहे की, तुमच्याबाबतीत जर भेदभाव होत असेल, तर तो भेदभाव कुणी दुसरा येऊन संपवेल म्हणून वाट बघत बसण्यापेक्षा, आज आम्हाला उपलब्ध असलेल्या अनेक माध्यमांच्या द्वारे आम्हीच पुढाकार घेतला पाहिजे. शबरीमलैच्या संदर्भात आम्हाला ते जाणवले आणि आम्ही स्वत:हून हा पुढाकार घेतला.
शिल्पा नायर यांच्या पुढाकाराने सुरू झालेले ‘रेडी टू वेट’ हे अभियान आणि त्यांची ही भूमिका, शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर असो किंवा इतरही हिंदू धर्मस्थळांच्या संदर्भात ‘मला काय त्याचे’ म्हणून मौन बसणार्या महाराष्ट्रातील धर्मप्रेमींना निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मला वाटते.
@@AUTHORINFO_V1@@