माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
‘गाठ’ अथवा ‘बंधन’ या शब्दाला कळत-नकळत नकारात्मकतेची झालर चिकटलेली असते. आपल्याला एकमेकांचा सहवास हवा असतो, सहजीवनातील सौख्य अनुभवायचं असतं. पण, या निमित्ताने येणाऱ्या नात्यांची जबाबदारी पेलण्यास मात्र आपली नापसंती असते. जबाबदारी आणि कर्तव्य हे समानार्थी शब्द असल्यामुळे, हे जोखड खांद्यावर घेताना दहा वेळा विचार केला जातो. पण, यालाच समानार्थी ‘बंधन’ हा शब्द ‘रक्षाबंधना’च्या संदर्भात येतो तेव्हा त्याचा अर्थ आणि आयामच बदलून जातो. कारण, हा शब्दही जबाबदारीचं निदर्शक म्हणून येत असला, तरी ही जबाबदारी नितांत सुंदर, मनोज्ञ आणि गहिरं नातं जपण्याची असते. भावा-बहिणीच्या नात्यामध्ये मुळातच प्रेमाचा नैसर्गिक पाझर असतो. तो ओलावा या नात्याला आपसूकच तजेलदार, सदाहरीत ठेवत असतो. पण, त्यातही काही व्यावहारिक, प्रासंगिक कारणांमुळे वाद झाला, मनं दुखावली, तरी आपण सहोदर आहोत आणि एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनाने बांधले गेलो आहोत, हे स्मरण करून देण्यासाठी या सणाची योजना असावी, असं वाटतं. कारण, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर बांधलेली ‘राखी’ या नात्यातील अभंगतेचं, अद्वैताचं प्रतीक असतेच; त्याचप्रमाणे दर वर्षी बांधली जाणारी प्रत्येक गाठ राखीच्या धाग्यावरच नव्हे, तर आठवणींच्या पोतडीवरही बसत असते. या पोतडीत असंख्य घटनांचा सुगंधी दरवळही बंदिस्त होत असतो. हे बंधन या मधुर नात्याने अनुभवलेल्या असंख्य चढउतारांचं साक्षीदार असतं. वय होतं तसं ते आणखी हवंहवंसं वाटू लागतं. लहानपणी सगळ्यात मोठी, सगळ्यात सुंदर राखी मिळावी, तिला चमकीचा कागद असावा, म्हणून बहिणीशी तंटणारा भाऊ मोठा होतो तेव्हा तिच्याकडून गोंड्याची का होईना, पण छोटीशी राखी यावी, याची वाट पाहात असतो. वाढत्या वयामुळे येणाऱ्या ‘अहो-जाहो’च्या संबोधनाने प्रौढ झालेलं त्याचं मन छोट्या बहिणीच्या “अरे दादा” किंवा मोठ्या बहिणीच्या, ‘अरे गधड्या’ या संबोधनासाठी तळमळत असतं. कारण ती हाक मनाला बालपणापर्यंत पोहोचवत असते. हातावर बांधली जाणारी प्रत्येक राखी अशा असंख्य भावभावना जपत असते. म्हणूनच ही प्रथा केवळ उपचार न राहता एक मनोज्ञ सण असतो.
भावा-बहिणीतलं हळवं नातं हे मानवी संबंधांमधील एक परमपवित्र आणि परममंगल नातं आहे. पुराणातील अनेक कथांमधूनही या नात्याचा वेध घेतलेला दिसतो. एक कथा या नात्याचा अचूक वेध घेते. ती आहे कृष्ण आणि पांचालीची कहाणी! ही गोष्ट अशी की, एकदा कृष्णाच्या बोटाला जखम होते आणि रक्ताची धार वाहू लागते. काही केल्या रक्त थांबत नाही. सर्वजण चिंताग्रस्त होतात. या गडबडीत प्रत्येक जण कापडाची चिंधी शोधू लागतो. पण, त्या राजवाड्यात चिंधीच नसते. मग पांचाली पुढे सरसावते आणि आपल्या अत्यंत मौल्यवान अशा महावस्त्राचा कोपरा फाडून कृष्णाच्या जखमेवर चिंधीसमान बांधते. तेवढ्या एका चिंधीने नव्हे, तर तिच्या प्रेममय भावनेने श्रीकृष्णाची जखम भरून येते. तेव्हापासून पांचाली आणि कृष्णामध्ये भावा-बहिणीचं नातं निर्माण होतं जे रक्ताच्या नात्यापेक्षाही उत्कट ठरतं, असं ही पुराणकथा सांगते. युगं लोटली तरी हे नातं अजरामर आहे. वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला विवस्त्र होण्यापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने अखंड वस्त्र पुरवलं ते याच चिंधीला जागून... असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ही झाली पुराणामधली एक कथा. ऐतिहासिक काळातही अशीच एक कथा प्रसिद्ध आहे. ती कथा आहे चित्तोडची राणी कर्मावती आणि हुमायूची. बहादूरशाहनं चित्तोडवर आक्रमण केलं आणि राणी कर्मावतीला आपला पराभव समोर दिसू लागला. शेवटी या राजपूत राणीने थेट मुघलांच्या दरबारात म्हणजेच हुमायूकडे राखी पाठवली आणि आपल्या राज्याचं रक्षण करण्याची विनंती केली. राणीकडून आलेली ती राखी पाहून हुमायूला तिच्या मनातील भावना समजल्या आणि या दुरून आलेल्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देत त्याने बहादूरशहाशी मोठी लढाई अंगावर घेतली. प्राणांची बाजी लावून दूरच्या एका मानी बहिणीचा आब राखला. राखीचं मोल इतकं मोठं आहे. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात असल्याचं पाहून व्यथित झालेल्या रवींद्रनाथ टागोरांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी परस्परांना राखी बांधण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला असल्याचं काही इतिहासकालीन नोंदी सांगतात. त्यावरूनही राखीचं महत्त्व अधोरेखित होतं.
थोडक्यात काय, तर भाऊ आणि बहिणीचं नातं नाजूक असतं, प्रेमार्द आणि स्नेहार्द असतं, पण ते ठरावीक चौकटीपुरतं कधीच मर्यादित नसतं. जात, धर्म, पंथ, स्थान यांसारख्या कोणत्याही मर्यादा या नात्याला अडवू शकत नाहीत. वर उल्लेखिलेल्या सर्व घटनांमध्ये निर्देश झालेल्या व्यक्तीमत्त्वांमधील भाव हे नातं केवळ प्रेमाचंच नाही, तर मान, आदर आणि आत्मियतेचं आहे, हेच दर्शवून देतात. काळ बदलला तसं हे नातंही बदलत आहे. आता भाऊ आणि बहीण अगदी मित्रांप्रमाणे सगळ्या भावना शेअर करू लागले आहेत. आपल्या आयुष्यातल्या सर्व बाबींविषयी एकमेकांशीमोकळेपणाने बोलू लागले आहेत. वेळ पडली तर एकमेकांना उपदेशदेखील करू लागले आहेत. शिक्षण अथवा नोकरीनिमित्तानेएकमेकांपासून लांब असूनदेखील नात्यामधील ओलावा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
या सर्व बदलत्या संदर्भांमध्ये एक विचार येऊन जातो - ‘रक्षा’ आणि ‘बंधन’ या शब्दांमध्ये नेमका कोणता संबंध असावा? यातली मूळ संकल्पना काय असावी? एका दिवसाच्या सणापलीकडे जाऊन एकूण आयुष्याचा विचार करता या प्रेमाचं, नात्याचं काय महत्त्व असावं? या सणामध्ये नक्की कोणती रक्षा अपेक्षित आहे? कशापासून आणि कुणापासून रक्षा अपेक्षित आहे? राखीच्या त्या तलम, रेशमी धाग्याचा आणि बंधनाचा अर्थ तरी काय? आजच्या काळातल्या विविध घटनांशी याचा संदर्भ नेमक्या कोणत्या अर्थाने जोडला जाऊ शकतो?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची, तर आजच्या काळात या नात्याची गरज अधिक तीव्रतेने आहे, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. आज आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर जगत आहोत. एकीकडे सगळी बंधनं, मर्यादा पार करून सर्व क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेणाऱ्या मुली, महिला आहेत आणि दुसरीकडे घरगुती हिंसा, बलात्कार, शारीरिक आणि मानसिक छळ अशा अन्यायाला बळी पडणाऱ्या लहान मुली, तरुणी आणि प्रौढ महिलाही आहेत. एकीकडे मनस्वी, स्वतंत्र, निर्भय आणि स्वाभिमानी झेप, तर दुसरीकडे केवळ यातना, अपमान आणि पिळवणूक... अशा विदारक आणि असंतुलित परिस्थितीकडे पाहिल्यानंतर ‘रक्षा’ या शब्दाचा अर्थ कोणत्या अर्थाने घ्यावा, हे वेगळं सांगण्याची गरज उरत नाही. सध्याच्या काळात रक्षा करणं म्हणजे कलुषित, प्रतिगामी, पूर्वग्रहदूषित आणि संकुचित दृष्टिकोन बदलणं, रक्षा करणं म्हणजे अडकवून न ठेवता उंच भरारी घेण्यासाठी मोकळं आकाश निर्माण करणं. रक्षा आधारही असते आणि स्वातंत्र्यही... रक्षा म्हणजे मानसन्मानाची जपणूक अन् तो वाढवण्याची ताकद देणारा आधार! राखी म्हणजे बंधन नव्हे, तर त्या बंधाच्या पलीकडे जाऊन सशक्त करणारं एक आश्वासन! रक्षा म्हणजे आपल्या बहिणीला जपतानाच इतर सर्व स्त्रियांनाही आदराने आणि समानतेने वागवण्याची समज... या दृष्टींनी विचार केला तर जाणवतं की, रक्षाबंधन हा केवळ सण नसून एक वचन आहे; जे एका दिवसासाठी नव्हे, तर आयुष्यभरासाठी पाळावं असं आहे. त्या वचनासाठी, ते निभावण्यासाठी भावा-बहिणीचं नातं मनापासून मानणं गरजेचं... राखीच्या या नाजूक बंधनात अडकवणाऱ्या आपल्या बहिणीला प्रत्येक भावाने स्वातंत्र्य आणि सुरक्षेचं वचन दिलं, बंधूबरोबरच बंधुत्व या भावनेचं आणि जाणिवेचं पालन करण्याची ग्वाही दिली, तर नक्कीच या सणाचा नवा आयाम सर्वांसमोर येईल.
अगदी ‘श्यामची आई’मधल्या ‘भरजरी गं पीतांबर’ या गाण्यातल्या-
‘रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम
पटली पाहिजे, अंतरीची खूण’
-वैष्णवी पेशवे
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/