माझ्या आयुष्यात अटलजींच्या तीन जाहीरसभा ऐकण्याचा योग आला. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा क्षण आहे
सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखणारे ‘भारतरत्न’ अटलजी हे एक अद्वितीय नेते होते. अत्यंत साधी राहणी, लोभस आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व, काळजाचा वेध घेणारे वक्तृत्व, प्रतिभाशाली नेतृत्व, या गुणांच्या बळावर त्यांनी केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील मान्यवरांच्या हृदयसिंहासनात स्थान मिळविले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वीय सहायकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास भाजप अध्यक्ष आणि पुढे भारताचे पंतप्रधानपदी तीन वेळा विराजमान होण्यापर्यंत खूपच स्पृहणीय आहे. अटलजी कायम सर्वांना विश्वासात घेऊन चालत असत. त्यांचा हा गुण एकमेवाद्वितीय होता, असे मला वाटते.
माझ्या आयुष्यात अटलजींच्या तीन जाहीरसभा ऐकण्याचा योग आला. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा क्षण आहे, असे मला वाटते. त्यांचे हसरे आणि लोभसवाणे व्यक्तिमत्त्व सर्वांना आपलेसे करून घेणारे होते. कायमच लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलजी...
भारतमातेविषयी अपार निष्ठा, जाज्वल्य राष्ट्रभक्ती हे त्यांचे गुण मनाला कायम भावले. त्यांचा प्रत्येक शब्द हा जिव्हेवरील सरस्वतीचे अधिष्ठान प्रकट करणारा होता. ते आले आणि त्यांनी सर्वांना जिंकून घेतले. त्यांचा मानवजन्म हा त्यांच्या कार्याने धन्य झाला. अशा पुण्यात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली
- आ. बाळासाहेब सानप
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/