माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
सन १९९१ मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी कोणत्या मान्यवराला आमंत्रित करावे, याविषयी कार्यकारी मंडळाची चर्चा सुरू होती. मी तेव्हा ‘सावाना’चा सांस्कृतिक सचिव होतो. मी अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव सुचवले. अटलजी तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. एवढा मोठा माणूस आपल्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी येईल का, याविषयी सर्वांनीच साशंकता व्यक्त केली. पण, मी कामानिमित्त दिल्लीला गेलो असता, त्यांना भेटून निमंत्रण द्यायचे ठरवले. त्यांनी सकाळी ७ ची भेटीची वेळ दिली. मी त्यांच्या घरी पोहोचलो असता, त्यांच्याशी आधीच दोन व्यक्ती चर्चा करीत होत्या. त्या गेल्यावर अटलजींनी मला पाहिले आणि म्हणाले, “तुम्हे बैठना पडेगा भाई... मैं जरा स्नान करके आता हूँ..’ आणि अर्ध्या तासाने प्रसन्न मुद्रेने अटलजी आले. त्यांना मी वाचनालयाची माहिती दिली. ‘सावाना’ची दीडशे वर्षांची परंपरा, ग्रंथसंपदा ऐकून त्यांना कौतुक वाटले. मी त्यांना सांगितले, “सावानाच्या शतक महोत्सवाला स्वातंत्र्यवीर सावरकर, तर शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला यशवंतराव चव्हाण आले होते. आता शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आपण यावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.”
अटल बिहारी वाजपेयी १९ मार्च १९९१ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईहून नाशिकला गाडीने शहरात आले होते. सूर्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. अटलजी पूर्ण दिवस आमच्याबरोबर होते. त्यांनी संपूर्णपणे वाचनालय पाहिले. सातशे वर्षांपूर्वीची पोथी आणि त्यांचे केलेले जतन पाहूनही त्यांना कौतुक वाटले. आठ हजार पोथ्या वाचनालयात आहेत. त्याची यादी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आहे. संदर्भ ग्रंथही त्यांनी स्वतः पाहिले. दुर्मीळ ग्रंथ पाहून त्याचे कौतुक केले. ‘झाशीची राणी’, ‘गोडसे भटजी’ ‘माझा प्रवास’ ही पुस्तकही त्यांनी चाळली.
त्यावेळेस त्यांनी वाचनालयाच्या सर्व कार्यकारी मंडळाला सोबत घेऊन नाशिकच्या हॉटेल सूर्या येथे ‘गेट-टुगेदर’ केल्याची आठवण आजही तत्कालीन पदाधिकार्यांच्या मनात ताजी आहे. विशेषतः त्यावेळी हॉटेलमालकांनी अटल बिहारी वाजपेयी असल्याने त्यावेळच्या भोजनाचे पैसेदेखील घेतले नाहीत. त्यांचे भाषा आणि साहित्यावर इतके प्रेम होते की, दिल्ली येथे भाजपच्या कार्यकारिणीची बैठक असतानाही ते नाशिकच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी त्यांची प्रसिद्ध कविता वाचून दाखविली होती. पुढे हीच कविता पद्मजा फेणाणी यांनी गायली.
अटलजी अतिशय साधे होते. त्यांचे वर्तन सर्वांशीच आपुलकी आणि प्रेमाचे होते. एक राष्ट्रीय नेतृत्व असल्याचे कोणतेही भाव त्यांच्या वागण्यात नव्हते. त्यांनी लहान मुलांसोबत हिरवळीवर बसून छायाचित्रेही काढून घेतल्याच्या आठवणी नाशिककरांनी आजही जपून ठेवल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान असताना वाचनालयाच्याच समारंभाला अटलजींनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती. सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘आनंद निधान’ या विशेषांकात भाषण करताना त्यांचे छायाचित्रही प्रसिद्ध आहे. याच अंकाच्या मुखपृष्ठावरही त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहे. नाशिक शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर समारंभात सहभागी होताना खूप आनंद वाटल्याचे त्यांनी यावेळी दिलेल्या अभिप्रायात म्हटले होते.
ते पंतप्रधान असतानाची एक आठवण आजही सांगितली जाते. ‘सावाना’चे अध्यक्ष मु. शं. औरंगाबादकर एकदा विमानाने काशीला निघाले होते. त्याचवेळेस तत्कालीन पंतप्रधान असलेले वाजपेयीजी हे सुद्धा प्रवासाला निघाले होते. त्यावेळी त्यांनी मु. शं. औरंगाबादकर यांना बरोबर ओळखले आणि त्यांना बोलावून नमस्कार केला. तसेच, “मी तुमच्या वाचनालयाच्या कार्यक्रमाला आलो होतो,” त्याची आठवणही करून दिली. पंतप्रधानपदाचे प्रोटोकॉल असूनही कुठलाही बडेजाव न आणता वाजपेयीजी अशा पद्धतीने अगदी साधेपणाने वागले होते. ही आठवणही मु. शं. औरंगाबादकर यांनी सांगितली होती.
‘मुझे यहाँ लानेवाले जुन्नरे कहाँ है?’
वाचनालयाच्या कार्यकारिणीवर असलेले रमेश जुन्नरे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण अटलजींना दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिले होते. सामाजिक-सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले जुन्नरे आज 74 वर्षांचे असून या भेटीचे वर्णन ते आपल्या जीवनातील ‘भाग्ययोग’ असे करतात. वाजपेयी यांना भेटण्यासाठी गेल्यावर “आपली अंघोळ अद्याप बाकी आहे,” असे सांगून जुन्नरे यांना त्यांनी प्रतीक्षा करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सविस्तर भेट घेतली. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाची माहिती ऐकल्यावर वाजपेयी प्रसन्न झाले आणि त्यांनी ताबडतोब आपले सेक्रेटरी यांना आपल्या तारखा पाहण्यास सांगितले आणि जुन्नरे यांना आपणास कोणती तारीख अपेक्षित आहे, असे विचारले. दिल्लीहून नाशिकला येताच त्यांनी प्रथम “मुझे यहाँ लानेवाले जुन्नरे कहाँ है?” अशी विचारणा केली. नाशिकच्या मुंबई-आग्रा रोडवरील सूर्या हॉटेलमध्ये ते उतरले होते. कार्यक्रमात वाचनालयाच्या ‘आनंद निधान’ या स्मरणिकेचे प्रकाशन वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम झाल्यावर हॉटेल सूर्यावर वाजपेयी यांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे त्यांच्यासमवेत भोजन झाले.
रमेश जुन्नरे
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/