मुंबई : माजी प्रधानमंत्री आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. देशातील सव्वाशे कोटीहून अधिक भारतीयांचे प्रेम लाभलेल्या अटलजींच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एक दूरदृष्टीचा, परिपक्व, संवेदनशील, मोठ्या मनाचा आणि दृढनिश्चयी नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालत भारताला एक महान राष्ट्र बनविण्याचा त्यांचा संकल्प पूर्णत्वास नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि आपण सारे त्यासाठी संकल्पबद्ध होऊ या, असेही शोकप्रस्तावात म्हटले आहे.