शिक्षकांचे वेतन होणार्या शालार्थ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे राज्य सरकारने जुलै २०१८ पर्यंत ऑफलाईन पगाराला परवानगी दिली होती. मात्र, जुलै संपल्यानंतरही शालार्थ प्रणालीतील बिघाड दूर झालेला नाही. त्यामुळे शिक्षकांच्या ऑगस्टच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. या प्रकाराची तातडीने दखल घेत आ. डावखरे यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते. तसेच मार्चपर्यंत ऑफलाईन वेतनाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर राज्य सरकारने अखेर मार्चपर्यंत ऑफलाईन वेतन काढण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.