केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2018
Total Views |



मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या देवभूमी केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू करण्यात आला आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाचे ५५ डॉक्टर्स, तर पुण्यातील ससून रुग्णालयाचे २६ डॉक्टर्स अशी एकूण ८१ डॉक्टरांचे पथक सोमवारी एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाले.

 

केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८० हजार कोटींहून अधिक किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात २० लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रादूर्भाव होण्याची भीती वाढली आहे. देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टरांची पथके केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील ५५ आणि ससून रुग्णालयाचे २६ डॉक्टर्स, असे ८१ डॉक्टरांचे पथक एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाले आहे.

 

दरम्यान, राज्यातून रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य सरकारकडून ३० टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. तसेच सोमवारी पाच टन साहित्य रवाना करण्यात आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्याची मदत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याकडून २० कोटींच्या मदतीची घोषणा यापूर्वी केली आहे.केरळ पूरग्रस्तांसाठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसह एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना मदत कार्यात अग्रभागी आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.

 

केरळ भवनात २०० टन साहित्य

नवी मुंबईतील केरळ भवनमध्येही सुमारे २०० टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नौदल तटरक्षकदलाच्या बोटीतून, रो-रो सेवेमार्फत पाठविण्यात आले आहे. सौदी येथून केरळला निघालेल्या २० व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होत्या. त्यांनी येथील केरळ भवनात आश्रय घेतला आहे.

 

विद्यापीठांनी मदत करावी : राज्यपाल

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठ महाविद्यालयांनी निधी संकलन करावे, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले. राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

@@AUTHORINFO_V1@@