२२ वर्षांच्या संघर्षानंतर पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शनिवारी इमरान खानचा शपथविधी थाटात पार पडला. शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती ममनून हुसैन इमरानला उर्दूत पंतप्रधानपदाची शपथ देत होते. पण, इंग्रजाळलेली जुबान असणार्या इमरानला ती शपथही चुकीच्या शब्दउच्चारणांसह, अडखळत घेण्याची दुर्देवी वेळ ओढवली. तेही अगदी हसण्यावारी नेत इमरानने कशीबशी वेळ मारून नेली आणि ‘कप्तानसाहेब’ पाकिस्तानचे ‘वझिर-ए-आजम’ म्हणून सत्तारुढ झाले. सत्तारोहणाच्या या साधेखानी सोहळ्यानंतर इमरान खान यांनी पाकिस्तानी जनतेला उद्देशून सव्वा तासांचे सर्वस्पर्शी भाषणही केले. भाषणाच्या अगदीच सुरुवातीला पाकिस्तान पंतप्रधानांचा शेकडो माणसांचा लवाजमा, गाड्यांच्या ताफ्यांचा तामझाम स्वीकारणार नसल्याची त्यांनी मोठी घोषणा केली. एवढेच काय, तर इस्लामाबादेतील प्रशस्त पंतप्रधान निवासाची जागा जागतिक दर्जाच्या संशोधन विद्यापीठासाठी वापरण्याचीही ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली. मुद्दा हाच की, जनता इतक्या गरिबीत दिवस कंठत असेल तर जनतेच्या पैशावर मजा मारण्याचा आम्हाला अधिकार नाही. इमरान यांनी ही तयारी दर्शविली असली तरी त्यांचे मंत्रिमंडळ ही ‘सादगी’ कितपत पाळते, हे मात्र पाहावे लागेल. त्याचबरोबर २८ हजार अब्ज डॉलरच्या कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या कडवट सत्य परिस्थितीची त्यांनी अवघ्या जनतेला जाणीव करून दिली. त्यांच्या भाषणात आज पाकिस्तानचे विविध क्षेत्रांतील नेमके स्थान आणि त्यामागील कारणमीमांसा हा मुख्य गाभा होताच. परंतु, केवळ राष्ट्रात आणीबाणीसम भीषण स्थिती आहे, एवढाच घंटानाद न करता, त्यावरील उपाययोजनांचीही इमरान यांनी मुद्देसूद केलेली मांडणी वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. जनतेला कळेल, समजेल आणि पटेल, अशा सोप्या भाषेत इमरानने आजच्या पाकिस्तानचे विदारक चित्र पाकिस्तानी आवामसमोर ठेवले. निवडणुकीपूर्वी घोषणा केल्याप्रमाणे ‘नवा पाकिस्तान’ घडविण्याआधी आजचा पाकिस्तान किती खोल गर्तेत रुतला आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला. त्यांचे पूर्वसुरी शरीफ आणि भुत्तो या घराणेशाहीच्या भ्रष्ट श्रीमंतांवर फारसे तोंडसुख न घेता, पाकिस्तानी जनतेचा लुटलेला, विदेशात नेलेला पैसा पुन्हा देशात आणण्याची मोठी घोषणाही इमरान यांनी केली. अब्जो डॉलरच्या कर्जात जखडलेला पाकिस्तान, व्याजासाठीही काढावी लागणारी कर्जे याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. शिवाय, पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या, धरण आणि सिंचनाची नितांत आवश्यकता, कृषिप्रधान समाजाची गरज, रोजगारनिर्मितीचे लक्ष्य, कौशल्य विकासावर भर, बालमृत्यूचा वाढता दर, विधवांचे प्रश्न, आरोग्याच्या अपुर्या सोयीसुविधा यावर इमरान यांनी समस्या आणि नियोजित उपाययोजनांसह भाष्य केले. त्याचबरोबर ज्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या मुद्द्यावर जनतेने त्यांना निवडून दिले, त्या विरोधात कडक कायदा आणि प्रशासकीय-पोलीस यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आपल्या भाषणात इमरान यांनी वेळोवेळी सौदीच्या रियासतीचा दाखला दिला. सौदीचे कडक कायदे-कानून आणि ‘कायद्यासमोर सर्व समान’ या मूल्याचा पाकिस्ताननेही आदर्श घेण्याचे इमरान यांनी पाकिस्तानी जनतेला आवाहन केले. दहशतवादाशी नेटाने लढण्याची आणि शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली. एकूणात, अतिशय भावनिक तरी तितकेच व्यवहार्य असे पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत आशावादी चित्र खान यांनी उभे केले असले तरी सरकारी तिजोरीतील खडखडाट पाहता, हे सगळे कितपत शक्य होईल, हे मात्र पाहावे लागेल.
खान यांच्या भाषणातील विविध मुद्दे, समस्यांच्या निराकरणाचे उपाय अगदी मोदींच्या कार्यशैलीशी साधर्म्य साधणारे. जसे की, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, आरोग्य विमा, स्वच्छ पाकिस्तानची घोषणा, जनतेला कर भरण्याचे आवाहन, भ्रष्टाचाऱ्याविरोधात कडक कायदा आणि खरे तर बरेच काही. मोदींचे ‘गुजरात मॉडेल’, तर खानसाहेबांनी खैबर पख्तुनख्वामध्ये त्यांच्या सरकारने केलेल्या यशस्वी योजनांची री ओढली. परंतु, मोदींची लोकप्रियता ही अर्जित आहे, तर पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचारी भुत्तो-शरीफांना पर्याय म्हणून जनतेने सूत्र इमरानकडे सोपविल्याचेही विसरून चालणार नाही. त्यातही इमरानला सत्तेच्या खुर्चीत बसविण्यात पाकिस्तानी लष्कराचा स्वार्थही लपून राहिलेला नाही. त्यामुळे मोदींपाठी मोठा जनाधार आहे, तर इमरानला लष्करी पाठबळाचा टेकू. इमरानची घटस्फोटित पत्नी आणि वृत्तनिवेदिका रेहम खान म्हणाली होती त्याप्रमाणे, “लष्कराला कोणी तरी बुटपॉलिशवाला हवा होता आणि इमरानच्या रूपात तो त्यांना मिळाला.” शिवाय, पाकिस्तानी माध्यमांनीही इमरानचे संमिश्र असे चित्र रंगविले. ‘जो आपली पत्नी व्यवस्थित सांभाळू शकत नाही, तो देश काय चालवणार?’ अशी सडेतोड टीकाही या ‘तालिबान खान’ वर झाली. त्यांच्या आसपासची भारतद्वेषी मंडळी, राजकीय नेतृत्वाचा अभाव हा प्रकर्षाने जाणवतो. त्यात माजी क्रिकेटपटू असलेले इमरान खान तितकेच रंगेल आणि अल्लड. क्रिकेटच्या मैदानात जरी त्यांनी पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दिला असेल, तरी त्यांची प्रतिमा निश्चितच विश्वासर्ह नाही.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये इमरानबाबत एकीकडे उदंड आशावाद असला तरी दुसरीकडे त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी साशंकता आहेच. त्यातच अमेरिकेसह जागतिक विधी संघटनांनी नाकारलेली आर्थिक मदत पाकिस्तानला दिवाळखोरीकडे नेणारी ठरू शकते. एका नाजूक आर्थिक-राजकीय स्थितीत स्वप्ने दाखविणारा नेता पाकचा पंतप्रधान झाला आहे. मोठी स्वप्नं पाहणं, ती जनतेलाही दाखविणं अजिबात गैर नाही, पण ती स्वप्ने सर्वस्वी सत्यात उतरविण्याची शक्ती आपल्या मनगटात आहे का, याचाही विचार इमरान खानला करावा लागेल. पाकी लष्कराच्या कुबड्यांवर इमरान खान यांचे ‘तेहरिक’ सरकार उभे आहे. त्यामुळे जोपर्यंत लष्करीकृपा, तोपर्यंत इमरानची राजकीय इनिंग सुरळीत असेलही. पण, लष्कराची अवकृपा झाल्यास इमरान यांनाही त्यांच्या पूर्वसुरींप्रमाणे ना ‘पाक’ सिद्ध करून लष्करी सत्तेचे काळे पर्व पाकिस्तानात पुन्हा नांदू शकते.