‘पीर फकीर’ आणि इमरान खान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2018   
Total Views |





 

 

 
बुशरा ही खरीच ‘पीर फकीर’ आहे, की लष्कराने आपले प्यादे म्हणून तिला पुढे करून हा सगळा बनाव घडवून आणला आहे? कारण, बुशराच्या भविष्यवाणीपेक्षाही इमरानचे यश लष्कराने योजलेल्या व्युहरचनेतून आलेले आहे.

 

शनिवारी पाकिस्तानचा २२ वा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये नखशिखांत आपला देह झाकून घेतलेली एक महिला उपस्थित होती. तिचे नाव बुशरा मनेका. ही इमरानची नवी आणि तिसरी पत्नी आहे. मागील फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा निकाह पार पडला. बुशराला आधीच्या पतीपासूनपाच मुले आहेत आणि तिच्याच प्रयत्नांनी इमरान याने दुसरा विवाह तलाकमध्ये परिवर्तित केला, असे म्हटले जाते. ही बुशरा कोणी सामान्य गृहिणी नसून ‘पीर फकीर’ म्हणजे आपल्याकडल्या बुवा-महाराजांप्रमाणे आध्यात्मिक गुरू मानली जाते. मागील अनेक वर्षांपासून आपल्या वैवाहिक व राजकीय जीवनात वैफल्यग्रस्त असलेला इमरान मन:शांतीसाठी अनेक पीर फकीरांचे उंबरठे झिजवत होता आणि त्यातच त्याची बुशराशीगाठ पडली. तेव्हा इमरान घटस्फोटीतच होता. त्याचा पहिला विवाह ब्रिटिश अब्जाधीश गोल्डस्मिथ यांची कन्या जेमिमाशी झालेला होता आणि तो नऊ वर्षे टिकला. नंतर एकलकोंडा असताना त्याचे परदेशी रेहम खानशी सुत जुळले. ही महिला आधुनिक युगातली व पत्रकार म्हणून बुद्धिमान मानली जात होती. फार काळ इमरानला तिच्याशी संसार चालवता आला नाही. सततच्या राजकीय पराभवांनी खचलेल्या इमरानला बुद्धिमान साथीदारापेक्षाही मन:शांती व भविष्यवाणी करणाऱ्या कुणाची गरज होती. त्याच कालखंडात बुशराशी त्याचा संबंध आला. तिनेच इमरानला उपदेश व आध्यात्मिक सांगताना राजकीय यशाची गुरूकिल्ली दिली. तिसरा विवाह केला, तरच पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकशील, असे भविष्य तिनेच इमरानला सांगितले होते. ते खरे करण्यासाठी इमरानने बुशराशीचतिसरा निकाह केला. निदान पाकिस्तानी माध्यमे तसे म्हणतात. आता ही ‘पीर फकीर पत्नी’ इमरानसह पाकिस्तानला कुठे घेऊन जाते बघायचे.

 

 
बुशरा मनेका ही चाळीशीतील महिला असून लाहोरनजीकच्या कुठल्या कुरेशी वंशातली आहे. आधी तिचा निकाह पाकिस्तानच्या एका वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याशी झालेला होता आणि वैवाहिक जीवन कंठतानाच ती अध्यात्माकडे वळली होती. तिला ‘पिंकी पीर’ म्हणूनही ओळखले जाते. आधीच्या पतीपासून तिला पाच मुले झालेली असून, मध्यंतरी तिने त्याच्याशी तलाक घेतला. योगायोग असा की, त्यापूर्वीच इमरानने रेहमलाही तलाक दिलेला होता. किंबहुना, रेहम व इमरान विवाहित असतानाच बुशरा व इमरान यांच्यात जवळीक सुरू झालेली होती. मन:शांतीसाठी बुशराशी भेटीगाठी चालू असताना इमरान इतका आहारी गेला की, त्याच्याशी रेहमचा दुरावा वाढत गेला. कदाचित तो दुरावा बुशरानेच वाढवला असावा, असेही म्हटले जाते. पण, ‘तिसरा निकाह आणि पंतप्रधानपद’ यांची सांगड या ‘पिंकी पीर’ने अशी घातली की, इमरान तिच्या थेट ‘प्रेमातच पडला.’ अर्थात, हा त्या दोघांच्या खाजगीजीवनातला मामला असल्याने इतरांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नाही. पण, सवाल इमरान या व्यक्तीचा नसून त्याच्या हाती देशाची राजकीय व प्रशासकीय सूत्रे गेलेली असल्याने, त्यात बुशरा किती ढवळाढवळ करणार, हा मुद्दा सार्वजनिक हिताचा आहे. आता पाकिस्तान राजकीय नेता चालवणार की ‘पीर फकीर’ चालवणार, हा प्रश्न जनतेशी निगडित आहे. एका बाजूला इमरानचे यश म्हणजे पाकिस्तानी लष्कराचा डावपेच असल्याचा खूप गवगवा झालेला आहे. हा तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचा पंतप्रधान असण्यापेक्षाही पाक लष्कराची कठपुतळी निवडून आणली गेली, असेही सगळीकडून म्हटले जात आहे. मग काही प्रश्न उपस्थित होतात. बुशरा ही खरीच ‘पीर फकीर’ आहे, की लष्कराने आपले प्यादे म्हणून तिला पुढे करून हा सगळा बनाव घडवून आणला आहे? कारण, बुशराच्या भविष्यवाणीपेक्षाही इमरानचे यश लष्कराने योजलेल्या व्युहरचनेतून आलेले आहे.

 

 
मागील दोन वर्षांपासून पाकिस्तानातील घडामोडी अतिशय वेगाने घडत गेलेल्या आहेत. त्यात बहुमताने निवडून आलेल्या नवाझ शरीफ यांना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी न्यायालयाचा हात पिरगळून लष्कराने कारवाया केल्या. नंतर संपूर्ण शरीफ कुटुंबाला परागंदा करण्याची योजलेली रणनीती जेव्हापासून अंमलात येऊ लागली, तेव्हाच इमरान व बुशरा यांच्यातले आध्यात्मिक प्रकरण सुरू व्हावे, याला निव्वळ योगायोग मानता येत नाही. ‘पनामा पेपर्स’ चव्हाट्यावर आल्यापासून शरीफ विरोधात खटल्याचे नाटक रंगू लागले आणि तोच कालावधी बुशराकडे इमरानने आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी जाण्याचा आहे. शरीफ यांच्या विरोधात सर्व बाबतीत न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यावरच बुशरा-इमरान अधिक जवळ आले की त्यांना जवळ आणले गेले? लष्कराला आपल्या तालावर नाचणाराराजकीय पक्ष व नेता हवा होता. त्यासाठी शरीफ यांची मुस्लीम लीग वा भुत्तो कुटुंबाची मालमत्ता असलेली पीपल्स पार्टी राजी नव्हती. त्यामुळेच मग मागली दोन दशके धडपडणार्‍या इमरानला लष्कराने आपल्या जाळ्यात ओढण्याच्या हालचाली सुरू केल्या असाव्या. त्यातून ‘बुशरा’ हे ‘प्यादे’ पुढे सरकवण्यात आले असावे. आध्यात्मिक गुरू पीर फकीर आशीर्वाद देऊ शकतात किंवा भविष्यवाणी नक्कीच करू शकतात. पण, ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आपल्याशीच कोणाला विवाहबद्ध होण्याचा सल्ला देण्याची, ही बहुधा जगातली पहिली घटना असावी. इमरानच्या दुसर्‍या लग्नाला दोन-तीन महिनेही झालेले नसतील, तेव्हा बुशरा त्याच्याशी परिचित झाली आणि तिने पंतप्रधान होण्यासाठी तिसर्‍या निकाहचा सल्ला इमरानला दिला. याचा अर्थ नुकताच रेहमशी झालेला निकाह मोडण्याचाच आग्रह होता. कारण, दुसर्‍या लग्नातून मोकळा झाल्याशिवाय इमरान तिसरा निकाह करू शकणार नव्हता. मात्र, त्याचा राजकीय गवगवा कोणालाच नको होता.

 

इमरानने म्हणून असेल, आधी रेहमला तलाक दिला आणि तेव्हाही बुशरा आपल्या पहिल्या पतीशी संसार करीत होती व आध्यात्मिक उपदेशही करीत होती. इमरानला तिसर्‍या विवाहाचे सल्ले देणार्‍या बुशरालाआपल्या प्रदीर्घकालीन विवाहात कोणती अडचण अकस्मात आली? इमरानच्या रेहमशी तलाक नंतर काही महिन्यांनी बुशराने आपल्या पहिल्या पतीकडून तलाक मिळवला आणि अल्पवधीतच इमरानने तिला आपल्याशी विवाह करण्यास सुचवले. पाच मुलांची आई आणि दोन लग्नांमध्ये अपयशी ठरलेला इमरान, तिसरा विवाह करून कोणते वैवाहिक जीवन जगणारहोते? इमरानसारख्या ‘प्ले बॉय’ म्हणून पूर्वायुष्य घालवलेल्या व्यक्तीमध्ये बुशराला कोणता आध्यात्मिक सहयोगी भेटला होता? की तिच्या माध्यमातून पाकिस्तानच्या प्रशासकीय नेतेपदी आपले बुजगावणे बसवण्याचा डाव पाक लष्कराने खेळलेला आहे? जो माणूस पाकच्या पंतप्रधानपदी शनिवारी विराजमान झाला, त्याने कुणाच्याही प्रभावाखाली कुठला निर्णय घेणार नसल्याची शपथ घेतली. पण, ज्याला आपल्याच व्यक्तिगत व वैवाहिक जीवनातले निर्णय अन्य कुणाच्या प्रभावाखाली घ्यावे लागले, तो शासकीय निर्णय स्वतंत्रपणे कसे घेऊ शकेल? एकूण या ‘बुशरा प्रकरणा’चे आता उघड होऊ लागलेले धागेदोरे पाहता, पुढल्या काळात पाकिस्तानच्या घडामोडी इमरानपेक्षाही ‘पिंकी पीर बुशरा’च्या हालचालीतून शोधाव्या लागणार आहेत. थोडक्यात पाकिस्तानची सत्तासूत्रे आजवर जिहादी मौलवी व लष्कर यांच्या हाती केंद्रीत झाली होती. यापुढे राजकारणाची सूत्रेही इस्लामी पीर फकीरांच्या हाती गेलीत असे दिसते. मग पीर फकीर देश चालवणार की त्यांनाच पाक सेनाधिकारी कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवणार, हे लवकरच दिसणार आहे. ‘शरीफ’, ‘भुत्तो’ ही नावे विसरून आपणही ‘बुशरा’ वा ‘पिंकी पीर’ या नावांची सवय अंगी बाणवून घेणे, भाग आहे. कारण आता तेच आपले शेजारी झालेले आहेत ना!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@