मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि परदेशी भूमीवर भारतीय संघाला जेतेपद प्राप्त करून देणारे पहिले भारतीय कर्णधार अजित वाडेकर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असणार्या वाडेकर यांनी जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ३७ सामने खेळले. १९५८ मध्ये मुंबईकडून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा ‘अर्जुन पुरस्काराने आणि १९७२ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
वाडेकर यांनी १३ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९७१ मध्ये वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्व नाथ, फारूख इंजिनीअर, बिशनसिंग बेदी, प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, श्रीनिवास वेकंटराघवन अशा दिग्गज खेळांडूंसमवेत वाडेकर यांनी भारतीय क्रिकेटचे सोनेरी पर्व साकारले. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.