स्वातंत्र्यदिनानिमित्त सद्भावना दाखवत हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाकिस्तान सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गजानन शर्मा यांच्या परिवारासाठी हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ३६ वर्षांआधी त्यांना जयपुर येथून अटक करण्यात आली होती, त्यांचा गुन्हा अद्याप कळलेला नाही, मात्र त्यांच्या जीवनाची महत्वाची वर्ष त्यांना केवळ भारतीय असल्याकारणाने पाकिस्तान येथे तुरुंगात घालवावी लागली.
कोण आहेत गजानन शर्मा :गजानन शर्मा हे जयपुर येथील रहिवासी आहेत. ३२ वर्षाचे असताना सीमेवरुन त्यांना पाकिस्तानी जवानांनी अटक केली. त्यांचा गुन्हा तेव्हाही स्पष्ट नव्हता. त्यांना केवळ २ महीन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता, मात्र त्यांना तब्बल ३६ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांच्या जीवंत असण्याविषयी त्यांच्या परिवाराला कल्पना नव्हती. आज सुटका करण्यात येणाऱ्या लोकांमध्ये गजाननचे नाव आढळल्यानंतर त्यांच्या परिवाराला याविषयी माहिती देण्यात आली, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. वाघा बॉर्डरवर परिवाराने गजानन यांचे स्वागत केले.
सरबजीत सिंह यांच्या प्रकरणानंतर पाकिस्तानात तुरुंगात डांबून ठेवलेल्या भारतीयांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. आज २९ भारतीयांची सुटका करण्यात आलेली आहे, मात्र अजून देखील अनेक निर्दोष भारतीय पाकिस्तान येथील वेगवेगळ्या तुरुंगात आहेत, त्यांच्या सुटकेविषयी पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.