तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या सिडकोच्या पाच नोडमध्ये १४ हजार, ८०० घरांच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. या घरांची ऑनलाईन अर्जविक्री सोमवारपासून सुरू झाली. १५ ऑगस्टपासून हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या १५ हजार घरांतील ५ हजार, २६२ घरे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असून ती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आहेत. शिल्लक ९ हजार, ५७६ घरे ही सर्वांसाठी खुली आहेत. पंतप्रधान आवास योजनेत राज्याच्या वतीने साडेसहा लाख घरे बांधली जाणार असून त्यातील जास्तीत जास्त जबाबदारी सिडकोने उचलावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे सिडकोच्या अडचणीत भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात गृहनिर्मिती करण्यासाठी लागणारी एकत्रित जमीन सिडकोकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक नोडमध्ये शिल्लक असलेल्या जमिनीवर घरांची निर्मिती केली जाणार आहे.