नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या उद्या (१५ ऑगस्ट रोजी) भव्य सोहळ्यात निमंत्रित खास पाहुण्यांना संरक्षण मंत्रालयातर्फे एक अनोखी भेट देण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांना वनवासी बांधवांनी तयार केलेले विशेष हातपंखे भेट म्हणून देण्यात येणार आहेत. केंद्रीय वनवासी व्यवहार मंत्रालयाचे ट्रायफेड व संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने असे १००० हातपंखे उद्याच्या कार्यक्रमासाठी मागवले आहेत. वनवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्याप्रती आपुलकी प्रकट करण्याची संधी आलेल्या निमंत्रितांना मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
देशभरातून विविध वनवासी भागांमधून यासाठी विविध हातपंखे मागवण्यात आले होते. मात्र आलेल्या मान्यवरांची सुरक्षितता, नियमावली व संकेत पाहता बांबूपासून बनवलेले साधे परंतु सुंदर हातपंखे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मालाही या वनवासी जमातीतील लोकांनी हे हातपंखे तयार केले आहेत. या पंख्यांवर दोन्ही बाजूंनी विविध चित्रे साकारण्यात आली आहेत. तसेच पंख्याच्या दांड्यावर “I am a fan of Tribes India” अशा ओळीही लिहिल्या आहेत. हे सर्व पंखे निष्णात वनवासी कलाकारांनी तयार केलेले आहेत व या व्यवहाराचे मूल्य थेट कलाकारांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.