पालघर : चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
हुतात्मा चौकाजवळ जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव),रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सुकूर गोविंदमोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे) यांना १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी हौतात्म्य आले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, आमदार अमित घोडा, विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हापरिषद मूख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी आदींनी पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी पालघर शहरातील बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.