स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केरळमध्ये पूर
पायाभूत सुविधा देखील नष्ट
एर्नाकुलम : गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळ राज्याला पुराचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या पावसामुळे आतापर्यंत ३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल १ लाखाहून अधिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून कार्य करत असून लष्कराला देखील याठिकाणी मदतीसाठी तैनात केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे केरळच्या उत्तर भागामध्ये अनेक नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झाल आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेक अजूनही बेपत्ता आहेत. अशा परिस्थिती देखील भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. तसेच अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देखील काल पूरग्रस्त ठिकाणांचा दौरा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनारायन विजयन यांच्यासह विमानाच्या सहाय्याने सिंग यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून तत्काळ १०० कोटी रुपयांचा मदतनिधी देखील केरळला दिला आहे. तसेच या आठवड्यात आणखी ८० कोटी रुपयांचा निधी देखील केरळ सरकारला दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
८ हजार कोटींच्या मालमत्तेचे झाले नुकसान
मुख्यमंत्री विजयन यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार या पुरामुळे राज्यातील एकूण ८ हजार ३१६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यातील १० हजार किमी लांबीचे रस्ते नष्ट झाले असून तब्बल २० हजार घरांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या केंद्र सरकारच्या मदतीने कार्य करत असून लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवू असे त्यांनी म्हटले आहे.