संघ आणि भाजप यांच्या हिंदुत्वाची सगळ्यात अर्वाच्य भाषेत हेटाळणी सनातनने केली आहे. संघप्रमुख डॉ. मोहनराव भागवतांवर सर्वात खालच्या पातळीवरून टीका सनातनने केली आहे आणि तरीही राजकीय फायद्यासाठी सनातन व संघ यांना एकाच मापाने मोजण्याचे प्रकार बिनदीक्कत चालू आहेत.
‘शिवसेना-वसंतसेना’ भाग-दोन : काँग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग! सनातनवरील बंदीला तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांचाच विरोध होता. १ डिसेंबर २०१५ रोजी लोकसभेत खा. सुप्रिया सुळे तावातावाने मोदी सरकारला जाब विचारत होत्या की, तुम्ही सनातनवर बंदी का घालत नाही? त्यावर मंत्री किरेन रिजीजु यांनी त्यांना उत्तर दिले की सनातनवर बंदी घालण्याएवढे पुरावे सरकारकडे नाहीत आणि बंदी कोर्टात टिकणार नाही.
मुख्य प्रश्न आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सनातनवर बंदीच्या विरोधात का होते? महाराष्ट्रात सनातनने अतिशय वेगाने आपला पसारा वाढवला. संघ आणि संबंधित हिंदू संघटना ज्या समाजघटकात ५० वर्षांमध्ये पोहोचू शकल्या नाहीत, त्यांच्यात सनातन फक्त पाच वर्षांमध्ये पोहोचली. खेड्यापाड्यात आक्रमक हिंदुत्व मांडणारे हिंदू मेळावे सुरू झाले. संघाची हिंदुत्वावरील मक्तेदारी मोडणारी एक शक्ती उदयाला येते आहे, हे बघून महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सनातनकडे काणाडोळा केला. त्याची परतफेड म्हणून सनातन संस्था त्यांच्या वृत्तपत्रात संघाला व सरसंघचालकांना तिरकस प्रश्न विचारू लागली, हेच का तुमचे हिंदुत्व, यालाच हिंदूराष्ट्रवाद म्हणतात का? वगैरे... काँग्रेस सरकारमधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री आबा पाटील यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले असा आरोप अंनिसचे श्याम मानव यांनी केला व वर हेही सांगितले की, आबांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शरद पवारांकडे गेलो आणि त्यांनी बंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिले. या सरकारने बंदीचा प्रस्ताव त्यांच्या केंद्र सरकारला पाठवला पण एकूणच ही ‘नुरा कुश्ती’ म्हणजे ‘खोटी कुस्ती’ होती. त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला. ठाण्यात सुतळी बॉम्बच्या स्फोटात सनातनचे काही लोक पकडले जाऊनही बंदीचा प्रस्ताव फेटाळला गेला हे आणखी एक नवल!
सनातनचा काँग्रेसला उपयोग काय?
शिवसेना पक्ष जेव्हा अतिशय नवीन होता तेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे वसंतरावांनी कम्युनिस्टांची ट्रेड युनियनमधील दादागिरी मोडून काढण्यासाठी शिवसेनेला बळ दिले. त्यामुळे शिवसेनेला गंमतीने ‘वसंतसेना’ म्हटले जायचे. हाच प्रयोग संघाला शह देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सनातनच्या बाबतीत करत होते. आबा पाटील ‘पक्षशिस्त’ मानणारे नेते होते. शरद पवारांना फाट्यावर मारण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती. त्यामुळे श्याम मानव म्हणतात, तसे आबांनी सनातन बंदीचा प्रस्ताव फेटाळला, तो पवारांच्या हुकुमावरूनच आणि नंतर पवारांनी स्वीकारला तो धोरण म्हणूनच. पण वास्तवात सनातनवर बंदी घालून काँग्रेस-राष्ट्रवादीला सनातनच्या प्रचंड मोठ्या साधक वर्गाला दुखावण्याची अजिबात इच्छा नव्हती. जर सनातन संस्था आहे तशीच झपाट्याने वाढत राहिली, तर संघाचा हिंदुत्व जनाधार घसरेल आणि परिणामी भाजपचा प्रसार कमी होईल, अशी भोळी आशा मनात होती. पण ती फोल ठरली. मग सनातन घातपातात सामील आहे, अशा बातम्या पुढे येऊ लागल्या तेव्हा त्याला ‘हिंदू दहशतवाद’ नावाच्या नव्या लेबलखाली संघाशी जोडून सगळ्यांना एकत्र बदनाम करता येईल, या हिशेबाने काँग्रेससाठी सनातनची उपयोगिता वाढली. पण लोकं संघ व सनातनला एका मापात मोजायला तयार होईना! मग सनातनचे संस्थापक डॉ. आठवले ब्राह्मण आहेत, (अनुयायी बहुसंख्य बहुजन असले तरीही) त्यामुळे सनातनला ब्राह्मणी कावा, मनुवादी यांच्याशी जोडणे सोपे जाईल म्हणून ती सगळ्यांच्याच सोयीची ‘पंचिंग बॅग’ झाली. पण यातला एकही प्रकार काँग्रेसच्या निर्णायक आणि निखळ फायद्याचा ठरत नव्हता. त्यामुळे आता सगळे घोंगडे भाजप सरकारच्या गळ्यात घालून दोघेही मोकळे झाले! संघ आणि भाजप यांच्या हिंदुत्वाची सगळ्यात अर्वाच्य भाषेत हेटाळणी सनातनने केली आहे. संघप्रमुख डॉ. मोहनराव भागवतांवर सर्वात खालच्या पातळीवरून टीका सनातनने केली आहे आणि तरीही राजकीय फायद्यासाठी सनातन व संघ यांना एकाच मापाने मोजण्याचे प्रकार बिनदीक्कत चालू आहेत. काल पकडलेले लोक खरेच गुन्हेगार आहेत का? ते सनातनचे खरेच साधक आहेत का? ते खरेच धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणार होते का? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. पण... एक गोष्ट नक्की आहे, राजकीय फायद्यासाठी आणि नेहरू-इंदिरा गांधी-सोनिया गांधी यांनी आपट-आपट-आपटून जो संघ संपला नाही, तो सनातनच्या उग्र हिंदुत्वाच्या काठीने संपवण्याचा आणि ‘वसंतसेने’च्या माध्यमातून अजून एक नवीन शिवसेना स्थापून संघाला ‘काऊंटर बॅलन्सिंग फोर्स’ तयार करण्याचे मोठे षडयंत्र मात्र सपशेल तोंडावर आपटले आहे!
-विनय जोशी