“बस आली... बस आली... बस आली...”“कुठे आहे बस? आपली नाही ती बस...” कुठल्याशा इंग्रजी नाटकाच्या अनुवादातील हा आशाळभूतांचा अपेक्षाभंग करणारा संवाद, सध्या बृहन्मुंबईतील कुठल्याही ‘बेस्ट’ बसथांब्यावर कोणत्याही वेळी अर्धा-पाऊण तास उभ्याने ताटकळावे लागणारा प्रत्येक मुंबईकर गेले दोन-तीन महिने चक्क जगत आहे एक काळ असा होता की, आम्ही मुंबईकर नागरिक पुणे-दिल्लीसारख्या अन्य कुठल्या मोठ्या शहरात गेलो आणि तिथली विलंबित बससेवा बघितली की, अभिमानाने म्हणायचो, “काही म्हणा, आमच्या मुंबईची ‘बेस्ट’ बससेवाच देशात सर्वात ‘बेस्ट’ आहे!” पण आज काय अनुभव आहे? गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये ‘बेस्ट’ची बससेवा चांगल्याकडून वाईटाकडे आणि वाईटाकडून अधिक वाईटाकडे झपाट्याने ढासळत चालली आहे, असाच सार्वत्रिक अनुभव आहे.
ढिसाळ प्रशासनामुळेच...
मला पूर्ण कल्पना आहे की, ढिसाळ प्रशासनामुळे सध्या बेस्ट उपक्रम प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे! त्यातच गतवर्षी भीमा-कोरेगावसाठी मुंबईतील काही मूर्ख राजकारण्यांनी केलेल्या आंदोलनात आततायी निदर्शकांनी अनेक ‘बेस्ट’ गाड्यांची दुर्दशा करून, त्या रस्त्यावर धावण्याच्या लायकीच्याच ठेवल्या नाहीत! सगळीकडून कावलेला ‘बेस्ट’ उपक्रम सरकारवरचा राग, आपल्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्या चा पगार व बोनस वगैरे कापून त्यांच्यावर काढू पाहत आहेत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी-वाहक-चालक-नियंत्रक काही न बोलता, आपल्या हातातल्या गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार न सोडता, मनमानीपणे उशिराने सोडून, प्रवाशांना वेठीला धरतात. आज अशी स्थिती आहे की, कुठल्याही बसमार्गावर प्रवास करायचा असेल तर, सर्वच प्रवाशांना किमान अर्धा-पाऊण तास तरी बसथांब्यांवर रखडावेच लागते आणि कित्येक बससेवा तर, केवळ दिखाव्यापुरत्या, नावालाच बसथांबा फलकांवर दाखवलेल्या बघायला मिळतात. आमच्या चेंबूरचेच उदाहरण सांगू? कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीला थेट पोहोचायला आम्हा चेंबूरकरांना अणुशक्तीनगर आगारातून सुटणारी ३७४ मर्यादित ही बससेवा खूप सोयीची पडायची. अर्ध्या-अर्ध्या तासाने बसच्या फेऱ्या होत्या. पण बसवेळ लक्षात ठेवून सोयीची बस विद्यार्थी पकडत. पण दीड-एक वर्षापासून ‘बेस्ट’ उपक्रमाने ३७४ ही बससेवा बंद जरी केली नसली तरी, ती गाडी आता मनमानीप्रमाणे दिवसातून एक-दोनदाच सोडली जाते! त्यामुळे वर्गाच्या व्याख्यानांसाठी विद्यानगरीत वेळेवर पोहोचण्याची इच्छा असलेल्या चेंबूर-देवनारच्या विद्यार्थ्यांना निमूटपणे वांद्रे आगाराची बस पकडून, ‘शीव’रेल्वे स्थानकाच्या थांब्यावर २१३ किंवा ३१२ क्रमांकाची बस बदलावी लागते. त्याही बसेस कधीच वेळेवर येत नाहीत. रिक्षाचा खर्च न परवडणारे कित्येक विद्यार्थी- वयोवृद्ध नागरिक उन्हापावसात अर्धा-पाऊण तास त्या थांब्यावर ताटकळले तरी बसचा पत्ताच नसतो! चेंबूरच्या द. कृ. सांडू उद्यानासमोरच्या ९२ क्रमांकाच्या बसमार्गाबाबतही हाच अनुभव प्रवाशांना येत असतो. असाच अनुभव दुपारच्या वेळेस वरळीच्या नेहरू तारांगणावरून ३७ नंबरची बस पकडून विद्यानगरी मार्गे कुर्ल्याला जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांना येताना दिसतो.
आगारातच पडलेल्या...
गंमत म्हणजे, थांब्यावर रखडलेल्या माझ्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराने ‘बेस्ट कंट्रोल’ला फोन करून, विलंबित बससेवेबद्दल तक्रार केली, तर तिथले कर्तव्यदक्ष नियंत्रक संबंधित ‘बेस्ट’ आगाराला लगोलग हलवतात आणि तुम्हाला हवी असलेली बस दहा मिनिटांमध्ये थांब्यावर येते. ती येऊ शकते, याचा अर्थ सर्वच बसगाड्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडल्यामुळे, आगारातून वेळेवर सोडायला उपलब्ध नसतात, ही सबब खरी नसते. वैतागलेल्या कर्मचाऱ्यानीच प्रवाशांना वेठीला धरलेले असते! सर्व बसप्रवाशांच्यावतीने मला ‘बेस्ट’ कर्मचाऱ्या ना विनंती करावीशी वाटते, “नाकर्त्या ‘बेस्ट’ प्रशासनाकडून तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आम्हाला तुमच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. पण उगाच प्रशासनावरचा राग प्रवाशांवर काढून आम्हाला वेठीला धरू नका. आम्ही तुमच्या कुटुंबीयांसारखेच त्रस्त आहोत.”
बाई, गेला थांबा कुणीकडे?
‘बेस्ट’ प्रशासनातल्या भोंगळपणाचा विषय आलाच आहे म्हणून रस्त्यांवरील स्टील थांब्यांच्या संशयास्पद व्यवहाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छिते. जर प्रवाशांना बससाठी अर्धा-पाऊण तास रखडावे लागत असेल तर, त्या थांब्यांवर बसण्यासाठी किमान बाके तरी असावीत, ही अपेक्षा गैरवाजवी ठरेल का? तीन-चार वर्षांपूर्वी ‘बेस्ट’च्या कुठल्यातरी वरिष्ठाने सर्व जुने बसथांबे मोडीत काढून स्टीलचे ‘पॉश’ चकचकीत थांबे रस्त्यांवर लावले, तेव्हा बरे वाटले होते. पण त्यातले कितीसे स्टील थांबे आजच्या घडीला धडके उभे आहेत, हा संशोधनाचा विषय व्हावा. कारण विद्यानगरीच्या थांब्यासारख्या कैक थांब्यांसमोरील स्टीलपत्रे उपाहारगृहातील टेबले बनवण्यासाठी पळवले गेलेच, पण आमच्या चेंबूरच्या सांडू उद्यानासमोरचा अख्खा बाकवाला स्टीलथांबा तीन महिन्यांपूर्वी गायब करण्यात आला!
तो एक विनोदच झाला...
प्रथम त्या थांब्यासमोरच्या रस्त्यात काहीतरी केबल वगैरे टाकण्याच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आणि रातोरात बाकथांबा अदृश्य होऊन केवळ एक खांब उभारण्यात आला! नंतर ते खोदकाम बुजवून रस्ता पूर्ववत झाला, पण मूळ थांबा काही परत आलाच नाही; म्हणून वैतागलेल्या प्रवाशांनी स्थानिक वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहारात त्या प्रश्नाला वाचा फोडली तर लगोलग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या थांब्यासमोर चपळाईने खोदकाम सुरू करण्यात आले आणि काहीतरी केबल वगैरे टाकण्याचे नाटक पुन्हा दोन आठवडे सुरू ठेवण्यात आले. दोन सप्ताहानंतर ते काम थांबून पुन्हा रस्ता पूर्ववत करण्यात आला. परंतु तो बसथांबा दांड्याच्या स्वरूपातच उरला! हीच परिस्थिती बऱ्या च ठिकाणी अनुभवास आली. चेंबूरकर नागरिक कौतुकाने ‘बाई, गेला बसथांबा कुणीकडे!’ हे वैतागगाणे गात आहेत.
सततची भाडेवाढ
‘बेस्ट’ची बनवाबनवी आणखी कशी सुरू असते? गेल्या महिन्यात ‘बेस्ट’ने, बसभाड्यात ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत दिली जाईल, अशी घोषणा केली. तेव्हा पण एकची ती बातमी वाचून, औषधोपचारादी विविध कामांसाठी निरूपायाने घराबाहेर पडावे लागणारे अनेक वयोवृद्ध नागरिक हौसेने, चला बाबा, आता ७० रुपयांच्या ऐवजी ३५ रुपये दैनिक पासात शहरात प्रवास करता येईल! पण कशाचं काय? पुढल्याच आठवड्यात ताज्या ‘बेस्ट’ भाडेवाढीची बातमी! सत्तरचा दैनिक पास नव्वदवर, उपनगरीय पन्नासचा साठवर नेल्याची! वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा कंडक्टरांना विचारायला सुरुवात केली की,”अहो, तुम्ही आम्हाला अर्ध्या तिकिटात प्रवास करू देणार होता ना ?” त्यावर “नाही हो. तशी काही सूचना अजून तरी आम्हाला मिळाली नाही आहे.” अशी उत्तरे त्या बिचाऱ्या कंडक्टरांना द्यावी लागली. तुम्हाला जमणार नव्हते, तर उगाच घोषणा करून महागाईने नडलेल्या वृद्धांना आशेला का लावायचे?
माहितीच्या अधिकाराखाली सांगा
सध्या अनेक सामाजिक कार्यकर्ते माहितीचा अधिकार कायद्याखाली प्रशासनाकडून गुप्त माहिती बाहेर काढून, ढिसाळ भ्रष्ट कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आणत आहेत. माझी या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या अधिकारात ‘बेस्ट’कडून माहिती मिळवावी, स्टील थांबे बसवण्याचा निर्णय जेव्हा ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला तेव्हा त्या मोहिमेत मुंबई शहर-उपनगरांत असे एकूण किती स्टील थांबे, किती कोटी रुपये खर्चाने बसवण्यात आले होते आणि त्यातील किती थांबे आजच्या घडीला सुखरूप उभे आहेत? हे थांबे वीज पडण्यापासून सुरक्षित आहेत का?
अपघातप्रवण बसमॉडेल
या आरटीआयवाल्यांना आणखी एक विषय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धसाला लावता येईल, तो म्हणजे, गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये बेस्टने, टाटाने बनवलेल्या एसीजीएल मॉडेलच्या नव्या गाड्यांनी (५२१ , २७ ) वगैरे मार्गांवर धावायाला सुरुवात केली आहे. ते मॉडेल प्रवाशांच्या दृष्टीने अजिबात सुरक्षित नसून, उलट धोकादायकच आहे; कारण उलट-सुलट बाके असलेल्या, बाकांशेजारी व वर हँडल्स नसलेल्या त्या गाड्यांचा ब्रेक लागला तर कुठे धरताही येत नाही. कुठल्यातरी क्रीडामहोत्सवासाठी हॉटेलवर उतरलेल्या खेळाडू-व्यवस्थापकांना जवळच्या मैदानावर आणण्यासाठी ज्या प्रकारच्या बसगाड्या बनवल्या जातात, त्या धर्तीचे हे बसमॉडेल आहे. साधारण अशाच एशियाड बसगाड्या पूर्वी आपल्या एसटी महामंडळाने खरेदी केल्या होत्या आणि त्यांतून प्रवास करताना १९९२ साली ज्येष्ठ कथाकार अरविंद गोखले यांचा ब्रेक लागल्यावर धडपडून अपघाती मृत्यू झाला होता! आता ‘बेस्ट’ उपक्रमही या कमी आसनी, सदोष रचनेच्या गाड्या, घणसोलीपर्यंतच्या दूरदूरच्या ५२१ क्रमांकाच्या मार्गावर सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. इथेही कोण्या प्रवाशाला अपघात होण्याची प्रतिक्षा ‘बेस्ट’ प्रशासन करीत आहे का? सामान्य प्रवाशांची गैरसोय करून सुरू केलेल्या वातानुकूलित बसगाड्या अपेक्षेप्रमाणेच तोट्यात गेल्या म्हणून भंगारात टाकल्या गेल्या. आता ‘बेस्ट’ प्रशासन खाजगी कंत्राटदारांकडून ४५० गाड्या चालवण्याचा घाट घालत आहे. औद्योगिक न्यायालयाने १४ फेब्रुवारीला त्या खाजगीकरणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे ‘बेस्ट’ कर्मचाऱ्या चा संप तेव्हा टळला होता! पण, एकूणच ‘बेस्ट’ची सर्वंकष झाडाझडती घेण्याची वेळ आता आली आहे !
- नीला उपाध्ये