चाळीसगाव :
शहरातील उघड्या गटारींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत १२७ कोटींच्या भुयारी गटारी योजनेला मंजुरी दिली आहे. पालिका सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगरसेवकांच्या उपस्थितीत या अभिनव योजनेचे शुक्रवारी सादरीकरण झाले.
येथे शहराला पाणीपुरवठा करणारी योजना गिरणा धरणावरून टाकण्यात आली आहे. आधीच्या जलवाहिनीला ७२ कोटींची समांतर पाणीपुरवठा योजना यापूर्वीच मंजूर झाली असून तिची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र शहरात उघड्या गटारीतून वाहणार्या पाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले होते. त्यांना आता दिलासा मिळणार आहे. दुर्गंधीपासून मुक्ती मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने प्राधान्यक्रमाने भुयारी गटारी योजनेचा पाठपुरावा केला होता. शहरात भुयारी गटार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील यश इंजिनियरींग यांनी डीपीआर तयार केला आहे. ही योजना कशी कार्यान्वित होईल याचे प्रेझेंटेशन नगरसेवकांना दाखविण्यात आले. चाळीसगाव शहर रोगराईमुक्त करण्यासाठी भुयारी गटार योजनेची आवश्यकता आहे अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. यावेळी पालिका सभागृहात सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय पाटील, नितीन पाटील, मानसिंग राजपूत, चिरागोद्दीन शेख उपस्थित होते.