गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त न झाल्यास कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |


 
सार्वजानिक बांधकाम मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना इशारा
 

मुंबई : मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो. त्यामुळे या दरम्यान या महामार्गावर वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग वाहतुकीसाठी सुयोग्य करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अन्यथा, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीत दिले. तसेच, पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा बैठकीत चंद्रकांत दादा पाटील यांनी अपूर्ण कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यापुढील काळात या महामार्गाच्या कामाचा वेग कमी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, अपघात होऊ नये याकरिता मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण करून चौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पाली-खोपोली पर्यायी मार्गावरचे खड्डेही गणपतीपूर्वी भरून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा. तसेच पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करण्याच्या सुचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

 

गणेशोत्सवानिमित्त टोलमाफी

महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे देखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोल नाक्यांवर होणारी वाहतुककोंडीचा विचार करता या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात, यावी असे निर्देश चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिले.

@@AUTHORINFO_V1@@