ठाणे - राज्यभर नुकतीच वृक्षलागवड मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी ठाणे महानगर पालिकेनेही अनेक रोपटी मागवली होती. मात्र, या रोपटयांचे रोपण न करता ती झाडे रामवाडी येथे फेकून दिली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे राजाभाऊ चव्हाण यांनी ठामपा आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठया उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यासाठी ठामपा आयुक्तांनी सुमारे १ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला होता. त्यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. मात्र, ठामपाच्या अधिकाऱ्या ना त्याचे महत्वच समजले नसल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा सोपस्कार पाडल्यानंतर उरलेली शेकडो झाडे वागळे इस्टेट येथील रामवाडी येथील डोंगरालगत वाल्मिकी मंदिरासमोर फेकून दिली आहेत. जनतेच्या करामधून ही मोहीम राबवली जात असल्याने अधिकाऱ्या च्या कामचुकारपणामुळे शेकडो झाडे आता अडगळीत फेकण्यात आलेली असल्याने अशा अधिकाऱ्या वर तत्काळ कारवाई करुन सदरच्या झाडांचे रोपण करावे, अशी मागणीही राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे.