समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मय निर्मिती केली आहे. त्यांच्या वाङ्मयाचा नुसता परिचय करून घ्यायचा म्हटले, तरी ते अवघड काम आहे. त्यांच्या बुद्धीची, प्रतिभेची झेप अफाट आहे. हे त्यांचे वाङ्मय वाचताना सहजपणे लक्षात येते. त्यांची धारणाशक्ती खूप चांगली आहे. नाशिकच्या बारा वर्षांच्या साधकदशेच्या काळात त्यांनी धार्मिक-पारमार्थिक तसेच विविध विषयांवरचे ग्रंथ अभ्यासले असतील. त्यातील ज्ञान आत्मसात केले असेल. समर्थभक्त शंकरराव देव यांनी भारतभर हिंडून समर्थासंबंधी मिळतील ती कागदपत्रे, त्यांचे वाङ्मय जमा केले आहे. त्यातील अनेक बाडे अजूनही धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात पडून आहेत. असे असले तरीही रामदास स्वामींचे प्रकाशित वाङ्मय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांच्या बारा वर्षांच्या तीर्थाटनाच्या काळात त्यांनी जागोजागी लोकांचे, एकंदर समाजाचे, धार्मिक प्रवृत्तींचे सूक्ष्म निरीक्षण केले आहे. परमार्थ, आध्यात्म, पुराण, विविध शास्त्रे, धार्मिक परंपरा, प्रपंच विज्ञान, राजकारण इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी विचार प्रकट केले आहेत. रामदासस्वामींचे वाङ्मय ओवीबद्ध असले, तरी त्यांची भाषा गद्याकडे झुकणारी आहे. दासबोध वाचताना याची प्रचिती येते.
तूर्तास त्याबाबतीत एवढेच सांगावेसे वाटते की, टीकाकारांनी कालविपर्यास करून रामदास स्वामींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काहीवेळा समर्थ वाङ्मय मुळातून न वाचता त्यांचे एखादे विधान स्वतंत्रपणे निवडून त्यावर टीका केली आहे. दासबोधाच्या दशक ७ , समास ९ यातील ज्या विधानामुळे समर्थांवर चांगल्या चांगल्या साहित्यिकांनी आणि मराठी विषय महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी टीका केली आहे, ते विधान म्हणजे- ‘टवाळा आवडे विनोद’ दासबोधातील ७ .९ .५१ च्या अर्धओवीतील या विधानामुळे ‘विनोदप्रिय’असणाऱ्याना रामदास स्वामींनी ‘टवाळ’ म्हटले आहे, असा गैरसमज निर्माण झाला. महाविद्यालयांतून पदव्युत्तर अभ्यासासाठी मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या व्याख्यानातून विनोदी वाङ्मय शिकवताना ‘टवाळा आवडे विनोद’ या समर्थकृत अर्धओवीचा उल्लेख हमखास येतो. अशावेळी रामदासांना विनोद समजत नव्हता, अशी टीका करून रामदास हे विनोदाचे शत्रू होते असे सांगण्यापर्यंत या विद्वान प्राध्यापकांची मजल गेलेली असते. सर्वप्रथम या संदर्भात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या निरीक्षणाने या विषयाची सुरुवात झाली. त्यांनी या संदर्भात निरीक्षण नोंदवले आहे की, ‘अध्यात्मविद्या सांगणाऱ्या पारमार्थिकांना उचित अशा गांभीर्याने ग्रंथरचना करणे भाग होते.’ न. चिं. केळकरांबद्दल आदर राखून असे वाटते की, त्यावेळी त्यांना कोणीतरी विचारायला हवे होते, ‘पारमार्थिकांनी विनोद करू नये का? त्यांना विनोदाचे वावडे आहे का?’
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत कानेटकर यांनी ‘विनोदाला भरती ओहोटी’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो ९ जानेवारी २००० च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झाला. लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण होता. त्या लेखात मराठी समाजमनात विनोदाचे स्थान स्पष्ट करताना प्रा. कानेटकरांनी लिहिले होते की, ‘मूर्खांची लक्षणे मोठ्या रोचकतेने सांगणारा संत शिरोमणीदेखील ‘टवाळा आवडे विनोद’ अशी अन्यायमूलक, असमंजस टीका सहज नोंदवून जातो.’ तो लेख वाचल्यावर मी अस्वस्थ झालो. मी त्यावेळी प्रा. कानेटकरांना एक सविस्तर पत्र लिहिले. दासबोधातील व समर्थचरित्रातील अनेक दाखले देऊन मी सिद्ध केले की, समर्थांनाही विनोद आवडत होता. ते विनोदाच्या विरोधात नव्हते. त्या पत्राची दखल घेऊन उत्तरादाखल माझे आभार मानून प्रा. कानेटकरांनी लिहिले होते की, ‘तुमच्या विवेचनाचे मी स्वागत करतो. समर्थांच्यासारखे श्रेष्ठ विचारवंत कार्यकर्ते श्रेष्ठ विनोदाबद्दल असे विपरीत कसे बोलतील? अशी शंका मलाही आली होती. आपल्या खुलाशाने या संबंधित वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, याचा मला आनंद वाटतो.’ त्यानंतर मे २००० मध्ये त्यांचे ‘फुले आणि फळे चिंतनाची’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकात ‘विनोदाला भरती ओहोटी’ हा लेखवरील खुलाशासह छापलेला आहे. या दोन्ही ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकांबद्दल मला आदर आहे. त्यांची विधाने सौम्य आहेत. तसेच प्रा. वसंत कानेटकरांनी समर्थांच्या विनोदाबद्दल वस्तुस्थिती स्पष्ट झाल्याची कबुली दिली आहे. परंतु काही विद्वान(?) प्राध्यापक टीकाकारांनी या संदर्भात विपर्यस्त विधाने करून स्वतःचे अज्ञान प्रकट केले आहे. एका प्राध्यापक टीकाकारांनी समर्थांच्या विनोदाबद्दल लिहिले आहे की, ‘टवाळा आवडे विनोद, असे शिक्कामोर्तब करून समर्थ रामदासांनी विनोदाला मराठी साहित्यातून हाकलून लावले आहे. बोहल्यावरून पलायन करणाऱ्या संताला विनोदाचे वावडे असावे, हे स्वाभाविकच आहे.’ असा खवचट अभिप्राय लिहिणाऱ्या या प्राध्यापक महाशयांनी समर्थवाङ्मय मुळातून किती वाचले असावे, याबद्दल शंकाच आहे. बहुधा वाचले नसेल कारण पेपरातील उत्तरे पूर्ण न वाचता त्या प्रश्नाला गुण देण्याची सवय या प्राध्यापक महाशयांना असावी.
‘पूर्ण ग्रंथ पाहिल्यावीण।
उगाच ठेवी जो दूषण ।’
अशांना समर्थांनी दासबोधात काय संबोधले आहे, ते पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. अशा ‘विद्वान, प्राध्यापक टीकाकारां’ना ‘महामूर्ख’ हे एकच विशेषण पुरेसे आहे. रामदास स्वामींच्या विनोदाबाबत या प्राध्यापकीय मतांना फारशी किंमत द्यायचे कारण नसले, तरीही समर्थांच्या ‘टवाळा आवडे विनोद’ या विधानाची सत्यासत्यता पुढील लेखात तपासून पाहू. म्हणजे या टीकाकारांच्या मताचे पितळ उघडे पडेल; तसेच समर्थांना विनोद आवडत होता, ते विनोदाच्या विरोधात नव्हते, हे स्पष्ट होईल.
-सुरेश जाखडी