नागपूर : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज सुरुवात झाली आहे. गेल्या शुक्रवारी पावसामुळे विधिमंडळ परिसरात पाणी साचल्यामुळे सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
दरम्यान अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच नागपूर अधिवेशनातील ढसाळ नियोजनासाठी सरकारला धारेवर धरले. गेल्या आठवड्यात पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज पुढे ढकलण्याची वेळ आल्यामुळे सरकार अधिवेशनाचे नियोजन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली. तसेच मुंबई आणि नागपूर या राज्याच्या दोन राजधान्याअसून सरकारच्या नियोजनशून्य कामामुळे दोन्ही राजधान्या आज 'जलमय' झाल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. दरम्यान थोड्या वेळाच्या या चर्चेनंतर सभागृहाच्या कामकाजाला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली आहे. राज्यातील आरोग्य सेवा आणि केंद्र सरकारच्या 'आयुष्मान भारत' या महत्त्वकांक्षी योजनेसंबंधीच्या प्रश्नांवर सभागृहामध्ये चर्चा सुरु आहे.
गेल्या आठवड्यामध्ये नागपूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विधिमंडळाच्या संपूर्ण परिसरात पाणी साचले होते. तसेच विधिमंडळासह शहरातील अनेक भागांमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. पावसामुळे शहरात समस्या निर्माण झाल्यामुळे अधिवेशनाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.