शिवाजी चौकात यंदा पावसाळा सुरू होताच दोन जीवघेणे अपघात झाले. यात मागील आठवड्यात आरोह आतराळे या ७ वर्षीय बालकाचा अपघात झाला तर त्यानंतर शनिवारी मनीषा भोईर ही महिला दुचाकीने शाळेतून घराच्या दिशेने शिवाजी चौकातून जात असताना केम्ब्रिज दुकानासमोरील उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरली आणि पाठीमागे बसलेल्या मनीषा भोईर रस्त्यावर पडल्या आणि बाजूने जाणार्या बसच्या चाकाखाली आल्या. या दुर्दैवी अपघातात जखमीं झालेल्या भोईर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील डांबरी रस्त्याबरोबर काँक्रीटीकरणाची कामे शहरात केली जात आहेत. यामध्ये बर्याचश्या कामात पेव्हरब्लॉकचा वापर करण्यात आल्याने रस्त्यांची पातळी समान न राहील्याने चढउतार निर्माण झाले आहेत. त्याच बरोबर काही ठिकाणी पेव्हरब्लॉक निघाल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे झाले आहेत. शिवाजी चौक परिसरात ही हीच परिस्थिती उदभवली आहे. याबाबत येथील व्यापार्यांच्यावतीने वारंवार केडीएमसीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
रामबाग ही खड्यातच
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसर ही महापालिकेच्या लगतचा परिसर आहे. या भागातील रस्त्यांची ही खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. या भागातील नागरिकांच्या वतीने सतत महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील भाजप जिल्हा सरचिटणीस तृप्ती दराडे याची तक्रार पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. रामबाग येथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पालिकेच्या वतीने येथील रामबाग १ या ठिकाणच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम निधी अभावी अपूर्णअवस्थेत ठेवण्यात आले आहे तर इतर काही ठिकाणी रस्त्यांच्या असमतोलपणा मुळे नागरिकांना गंभीर दुखपतींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती दराडे यानी दिली. तसेच या रस्त्याच्या उंच सखल पणामुळे मोठ्या पावसात येथे पाणी साचत असल्याची माहिती येथील ७५ वर्षीय वयोवृध्द महिला विमला देवी सिंग यांनी दिली.