पावसामुळे बिघडलेल्या परिस्थितीत शिक्षण विभागाने दिला विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई : मुंबई येथे पावसाने थैमान घातले आहे. यामुळे चाकरमान्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना शाळेला आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मिलन, अंधेरी सबवे, अंधेरी जंक्शन बरोबरच मालाड भुयारी मार्गांखाली सांडपाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये या दृष्टीने शासनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या जोरदार पावसामुळे लोकलच्या ट्रॅकवर देखील पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे लोकल देखील उशीराने धावत आहेत. पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुंबईकरांचे हाल होत आहेत.
अकरावीच्या प्रवेशासाठी मुदतवाढ :
दरम्यान अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी आजची म्हणजेच ९ जुलै ही अंतिम तारीख होती, मात्र पावसाचा जोर बघता शिक्षण मंत्रालयातर्फे ही मुदत वाढवून १० जुलै करण्यात आली आहे, त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.