पुणे-मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
लोणावळा : पुणे-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील लोणावळा येथे आज पहाटे रेल्वेला अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना एलटीटी- मदुराई एक्सप्रेस या रेल्वेचा डबा अचानकपणे रूळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातामुळे पुणे-मुंबई दरम्यान होणारी रेल्वे वाहतूक मात्र ठप्प झाली आहे.
आज पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना खंडाळा पार केल्यानंतर लोणावळ्याच्या जवळ अचानक रेल्वेचा एक डबा रुळावरून खाली उतरला. परंतु मर्यादित वेगामुळे कसल्याही प्रकारची मोठी हानी झाली नाही. यानंतर तत्काळ जवळील स्थानकाशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण करण्यात आले. सध्या रेल्वेचे डबे रुळावरून हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान अपघातामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचा साहजिकच परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्या या उशिरा धावत आहेत. तर काही लांब पल्ल्याचा गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.