मुसळधार पावसामुळे विधिमंडळसह संपूर्ण नागपूर झाले 'जलयुक्त'
नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पावसामुळे विधीमंडळाच्या परिसरामध्ये सर्वत्र पाणी साचल्यामुळे तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. विधीमंडळाबरोबरच अधिवेशनासाठी आलेल्या सर्व नेत्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर देखील गुडघाभर पाणी जमा झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे शहरासह विधिमंडळाची देखील वीज सकाळपासून गुल झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने विधीमंडळाचे काम येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान पावसामुळे अधिवेशन स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे विरोधकांकडून पुन्हा सरकारला यासाठी धारेवर धरले जात आहे. नागपूर प्रशासन आणि फडणवीस सरकारच्या शून्य नियोजनामुळे आज आपल्याला 'जलयुक्त नागपूर' पाहायला मिळत आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांना साधे आपले 'नागपूर' देखील नीट सांभाळता येत नाही का ? असा सवाल काही विरोधक विचारत आहे.