अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2018
Total Views |




‘अभाविप’च्या संस्थात्मक स्थापनेच्या प्रक्रियेतील एक प्रमुख कार्यकर्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या चरित्रावर आधारित ‘आधारवड’ या पुस्तकाचे आज, दि. ७ जुलै रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते नागपूर येथे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील प्रकरणाचा संक्षिप्त अंश...

विदर्भातील बुलढाणा जिल्हा विविध पैलूंनी समृद्ध आहे. या जिल्ह्यातली सिंदखेडराजा ही राष्ट्रमाता जिजाबाईंची जन्मभूमी. श्री संत गजानन महाराजांची कर्मभूमी शेगाव याच जिल्ह्यात. उल्कापाताने नैसर्गिक चमत्काराच्या रुपात साकार झालेले लोणार सरोवर याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच विशिष्ट नैसर्गिक स्थितीमुळे तप्त विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळाली, तीही बुलढाणा शहरालाच. या जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील छोटेसे गाव डिडोळ ही डिडोळकर परिवाराची मूळ भूमी. जळगाव जामोद येथे या परिवाराची थोडीफार शेतीही होती. मात्र, त्या काळातल्या प्रथेशी सुसंगत असणार्‍या मोठ्या संख्येच्या परिवाराचा संपूर्ण चरितार्थ शेतीवर होणे शक्य नव्हते. त्यामुळे तीन-चार पिढ्यांपूर्वीच घरातील काही भाऊ नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने शहराकडे वळले. देवीदासराव या काळात नागपूर येथे ब्रिटिश आमदनीतल्या कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करू लागले. जळगाव जामोद येथील शेतीत त्यांच्या वाट्याची दीड एकर जमीन होती. मात्र, पुढे ती जमीन कसण्याकरिता त्यांच्या मुला-नातवंडांपैकी कोणी गावात न राहिल्याने ती जमीन डिडोळकर परिवाराने जळगाव जामोद नगरपरिषदेला दान करून टाकली. आज तेथे गंगूबाई डिडोळकर यांच्या नावाने नगरपरिषदेने एक उद्यान उभारले आहे. याच गंगूबाईंच्या पोटी दत्तात्रेय देवीदासराव डिडोळकर यांचा जन्म १९२३ साली, ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेला झाला. प्रचलित परंपरेनुसार, आईच्या माहेरी मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. विश्‍वनाथ आणि काशिनाथ या दोघा मुलांच्या पाठीवर आणि शैलजा या सगळ्यात धाकट्या मुलीच्या आधी तिसर्‍या अपत्याच्या रुपाने दत्तात्रय हे डिडोळकरांच्या परिवारात दाखल झाले.

 

दत्ताजींचे वडील नागपूरला कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करीत होते. विश्‍वनाथ आणि काशिनाथ या दोघा ज्येष्ठ बंधुंचे शिक्षण नागपुरातच सुरू होते. चिटणीसपुरा येथे त्यांचे वास्तव्य होते. नागपूरचा हा महाल, चिटणीसपुरा इ. भाग ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आद्यभूमी. महालातल्या मोहितेवाड्यातच पहिली संघशाखा सुरू झाली होती आणि वर्षभरातच संघशाखांचा विस्तार फोफावू लागला होता. मैदानावर भरगच्च संख्येने (अगदी दीडशे-दोनशेसुद्धा) जमलेल्या कुमार-किशोरांच्या जत्रा रोज संध्याकाळी फुलू लागल्या होत्या. मैदानी खेळ, कसरती-कवायती, देशभक्तीपर गोष्टी-गीते इत्यादीच्या माध्यमांतून बालवयातल्या उत्साह, जोशाला उत्तेजन देण्याबरोबरच शिस्त आणि राष्ट्रीयता यांचे संस्कार बळकट करण्यावर शाखेवरील कार्यकर्त्यांचा भर असे. शाखेत अर्थातच शालेय वयाच्या बालकांचा (संघाच्या परिभाषेत बाल आणि शिशु) मुख्यतः भरणा असे. शाखा चालविणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये थोडेसे मोठ्या वयाचे, तरुण असत. वडील देवीदासराव आणि दोघे मोठे भाऊ यांचाही संघशाखांशी संपर्क होताच. खेळ, खोड्या, दंगामस्ती यांसारख्या शैशव सुलभ बाबींना शाखेमध्ये भरपूर वाव होता. घरातल्या वडिलधार्‍यांची मानसिकता ही मुलांभोवती अतिरिक्‍त संरक्षक कवच उभारून, त्यांना चार भिंतीमध्ये बंदीस्त करण्याची नव्हती. उलट, उघड्या मैदानावर भरपूर खेळावे, मित्रमेळा जमवावा यासाठी घरातून प्रोत्साहन असायचे. शाखेवर समवयस्क सवंगडी भरपूर मिळायचे. खेळांचेही आकर्षण होतेच. त्यासोबत देशभक्तीपर गाणी, ऐतिहासिक महापुरूषांच्या रोमहर्षक गोष्टी इत्यादीमधून बालमनांवर देशप्रेमाचे, सामूहिकतेचे आणि अनुशासनाचे संस्कारही सहजपणे अंकित होते असत. बाळासाहेब, भाऊराव देवरस बंधूही याच काळात बाल स्वयंसेवक या रूपात संघ शाखांच्या कामात भरपूर सक्रिय होते. बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्त्वाखाली ‘कुशपथक’ नावाचा मुलांचा एक विशेष गटच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी निर्माण केला होता. खुद्द डॉक्टरांच्याच सूक्ष्म देखरेखीखाली विकसित होत असलेल्या संघाच्या या प्रारंभिक वाटचालीच्या काळातच दत्ताजी शाखेत रमू लागले होते. स्वाभाविकच संघस्पर्शाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा आणि खोलवर उमटला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संघसंस्कारही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फुलत गेला; इतका की, पुढच्या सार्‍या आयुष्यातल्या जगण्याचा तोच एक प्रमुख घटक झाला.

 

सुरूवातीपासून दत्तात्रयची बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती चतुरस्र होती. घरातून तसेच संघशाखेतून मिळणारे देशप्रेमाचे बाळकडू, स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभव देशभक्तीपर साहित्याचे वाचन-मनन इ.मधून विचारशक्तीला पैलू पडत होते. पटवर्धन हायस्कूलमध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत त्यांना विशेष गुणवत्तेसह यश मिळाले. १९४४ मध्ये ते इंटर सायन्स झाले. १९४७ मध्ये बी.एस्सी (ऑनर्स) होत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. (त्यावेळी बी.एस्सी ऑनर्सला आजच्या एम.एस्सीचा दर्जा होता.) शिक्षण घेता घेताच रा. स्व. संघाचेच काम पूर्णवेळ अंगीकारायचे, हा विचार त्यांच्या मनात दृढ होता. दरम्यान, १९४० साली डॉ. हेडगेवारांचे निधन झाले. दत्तात्रय त्यावेळी १६ -१७ वर्षांचे होते. संघाचे काम नियोजनबद्धपद्धतीने देशभरात विस्तारत होते. शिक्षणाच्या निमित्ताने तरूण स्वयंसेवकांना देशाच्या विविध भागात पाठविण्याचा क्रम डॉक्टरांनी सुरू केला होता. ‘प्रचारक’ ही संज्ञा अधिकृतपणे वापरली जाऊ लागली नसली, तर ती वृत्ती धारण केलेले अनेक तरूण दक्षिणेपासून उत्तर टोकापर्यंत (खाली मद्रास म्हणजे आजच्या तामिळनाडू ते थेट लहारे-मुलतानपर्यंत) संघाच्या कामाच्या विस्तारासाठी जाऊन राहिले होते. विस्ताराच्या याच क्रमाने माधवराव गोळवळकर हे बनारस हिंदू विश्‍वविद्यालयात संघाच्या संपर्कात आले आणि त्यांची प्रतिभा, योग्यता अचुकपणे ओळखून डॉ. हेडगेवारांनी त्यांना आपला वारस म्हणून जाहीर केले.

 

१९४० पासून सरसंघलाचकपदाची सूत्रे गुरूजी (गोळवळकर) यांनी हाती घेतली आणि देशभरातल्या कार्यविस्ताराला गती देण्याच्या कामाला त्यांनी अग्रक्रम दिला.देशाला स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. त्याचबरोबर देशाची फाळणी करण्याची मागणी ही अत्यंत उग्ररूप धारण करू लागली होती. हिंदू-मुस्लीम तणाव उत्तरोत्तर गंभीर होऊ लागला होता. त्यावेळचे ब्रिटिश राज्यकर्ते हे अत्यंत कुटीलपणे त्या तणावाला प्रोत्साहन देत होते. देशाच्या विविध भागात हा तणाव हिंसक दंगलींच्या स्वरूपात प्रकट होऊ लागला होता. एकूण वातावरण एका बाजूने प्रक्षुब्ध होऊ लागलेले, तर दुसर्‍या बाजूने भारलेले होते. भविष्यवेधी दृष्टिकोनातून गोळवलकर गुरूजी या परिस्थितीचा विचार करीत होते आणि अत्यंत धीरादात्तपणे संघकार्याच्या उलगड्याला दिशा देत होते. “आगामी काळ हा देशाचे स्वातंत्र्य आणि देशाची उभारणी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे संघकार्याच्या दृढीकरणासाठी अधिकाधिक वेळ देण्याची निकड आहे,” असे आवाहन गुरूजींनी तरूण स्वयंसेवकांना उद्देशून केले. या आवाहनाला तरूणांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि देशभरात संघप्रचारकांची मोठी संख्या कार्यरत झाली.

 

दत्तात्रय डिडोळकर याच क्रमात प्रचारक बनले. १९४७ साली त्यांचे एम.एस्सी शिक्षण पूर्ण झाले. लगेच त्यांनी ‘प्रचारक’ म्हणून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती तत्कालीन मद्रास प्रांतात कालिकत येथे जिल्हा प्रचारक म्हणून करण्यात आली. आजचे केरळ आणि तामिळनाडू हे दोन्ही प्रांताचे क्षेत्र त्यावेळच्या मद्रास प्रांतात समाविष्ट होते. संघकार्याच्या दृष्टीने हा भाग त्यावेळी अत्यंत कष्टमय होता. स्थानिक बांधवांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या भाषेचा मुख्य अडसर होता. दत्ताजी तामिळ व मल्याळी भाषा शिकले आणि त्या अडथळ्यावर त्यांनी मात केली. मात्र, दक्षिणेत गेल्यापासून वर्षभराच्या आतच देशावर महात्मा गांधीजींच्या हत्येचे संकट ओढवले. संघाच्या दृष्टीने तर, हे संकट विक्राळ रूप धारण करून आले. सत्ताधार्‍यांनी या हत्येचे किटाळ संघाच्या माथी मारण्याचा नियोजनबद्ध आणि अघोरी प्रयत्न केला. संघद्वेष आणि ब्राह्मणद्वेषाला उकळी आणण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊन दोषमुक्त होण्यापूर्वीच संघ स्वयंसेवकांना अपराधी मानून त्यांच्यावर हिंसक हल्ले रचण्यात आले. महाराष्ट्रात तर गावोगाव या हल्ल्यांचे पेव फुटले. संघाची आद्यभूमी असलेले नागपूर यातून सुटणे शक्यच नव्हते. त्यातच दत्ताजींचे कुटुंब ऐन महाल भागात राहत होते. त्यांच्या घरालाही जाळपोळीची धग बसलीच. घरातले फर्निचर, पुस्तके यांची हिंसक जमावाने होळी केली. दत्ताजी मद्रासमध्येच होते, पण नित्य संघशाखांना मात्र खिळ बसली होती. संघावर बंदी घालण्यात येऊन प्रमुख कार्यकत्यांची धरपकड सुरू झाली होती. सरसंघचालक गुरूजींनी अधिकृतपणे शाखा बंद केल्या होत्या. ’युक्तीबुद्धीने सहजपणे दूर करावी जनभ्रांती, संघटनेची स्थिती पहाया रोज जमावे एकांती‘ या संघगीताच्याच पंक्ती प्रत्यक्ष व्यवहारात अंगीकारण्याचा प्रसंग उद्भवला. संघाच्या प्रचारकांनी मात्र हा प्रसंग अत्यंत संयमाने, धैर्याने आणि कुशलतेने निभावला. संघाची शाखा बंद असली तरी, अन्य मार्गांनी विविध निमित्तांनी स्वयंसेवकांचे, विशेषतः तरूणांचे एकत्र जमणे स्थानिक स्तरावर प्रचारकांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले.

 

याचा क्रमात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेची एका अस्थायी मंचाच्या स्वरुपात सुरुवात करण्यात आली. या संघटनेच्या स्थापनेत आणि प्रारंभिक जडणघडणीत ज्येष्ठ प्रचारक आणि विचारवंत कार्यकर्ते दत्तोपंत ठेंगडी यांचा पुढाकार होता आणि त्यांच्यासोबत असणार्‍या तरुण कार्यकर्त्यांमध्ये दत्ताजी डिडोळकर (ते त्यावेळी पंचविशीत होते) यांचा अग्रभागी समावेश होता. बंदीनंतर वर्षभरासाठी दत्ताजी नागपूरला परतले होते. विद्यार्थी परिषदेच्या ‘नागपूर विद्यापीठ’ विभागाने मंत्री या नात्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हा ते १९४८ साली नागपूरच्या विधी महाविद्यालयात वकिलीचा अभ्यासही करु लागले होते. दत्तोेपंत ठेंगडी आणि दत्ताजी डिडोळकर या दोघांमधील स्नेहसंबंधांना आणखीनही काही महत्त्वाचे पैलू होते. दत्तोपंत प्रचारक म्हणून १९४२ ते १९४६ केरळमध्येच कालिकत येथे राहिले होते. त्यांच्या पाठोपाठ १९४७ साली दत्ताजी कालिकत येथेच जिल्हा प्रचारक म्हणून रुजू झाले होते. विद्यार्थी परिषदेची स्थापना हा त्यांच्या एकत्रित चिंतन आणि कार्याचा दुसरा महत्त्वपूर्ण पैलू. याबद्दलचा तपशील स्वतः दत्तोपंत ठेंगडी यांच्यात शब्दातून समजून घेणे उद्बोधक ठरेल. दत्ताजींच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या एका विस्तृत लेखात दत्तोपंत लिहितात-

 

“इसके पश्‍चात हमारे निकट संपर्क का कालवधी आया अ. भा. विद्यार्थी परिषद के प्रारंभिक दिनों में । संघ की प्रेरणा से स्वयंसेवकोंने निर्माण की हुई अखिल भारतीय स्वरुप की यह पहली ही संस्था थी। इस तरह की सार्वजनिक संस्था चलाने का अभ्यास आम तौर पर स्वयंसेवकों को नही था। उस समय देश में और कुछ विद्यार्थी संगठन कार्यरत थे। कार्यपद्धती की दृष्टी से उनकी केवल नकल करना इतना ही सोचा हुआ होता, तो ज्यादा कठिनाई की बात नही थी। अधिक परिश्रम और विशेष प्रतिभा की भी आवश्यकता नही थी। किन्तु ऐसा विचार नही था। संघ के आदर्शो सिद्धांतो के प्रकाश मे, संघ ने सीखायी हुई रीति-नीति-पद्धति को विद्यार्थी क्षेत्र करते हुए राष्ट्रसंवर्धन कार्य का विद्यार्थी मोर्चा इस नाते दायित्व संभालनेवाला अपने ढंग का एक अनोखा विद्यार्थी संगठन खडा करने का यह संकल्प था। इसका शुभारंभ करनेवाले देश के सर्व प्रमुख मे से एक थे दत्ताजी डिडोलकर। विद्यार्थी परिषदेच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख कार्यकर्ते दत्ताजी होते, हे आज फारच थोड्या कार्यकर्त्यांना माहीत असलेले वास्तव नमूद करण्याबरोबर त्या प्रारंभिक दिवसांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक विकासात दत्ताजींनी निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही सविस्तर विवरण दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांच्या या लेखात केले आहे.

 

स्थापनेच्या वेळचे परिषदेचे पहिले अखिल भारतीय अध्यक्ष होते ओमप्रकाश बहल, तर अखिल भारतीय महामंत्री होते वेदप्रकाश नंदा. मात्र, संघटनेच्या विस्ताराचा विचार करायचा तर भारतातल्या काही प्रमुख शहरांपुरताच तो मर्यादित होता. त्या शहराच्या एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यावरच संबंधित प्रदेशात कार्यविस्तार आणि कार्याचे स्थैर्य निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. केंद्रीय स्तरावरुन आणि कार्यविचार आणि कार्याचे स्थैर्य निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. केंद्रीय स्तरावरुन नियोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम-उपक्रमांचे आपापल्या स्थानी क्रियान्वयन करणे आणि त्याचबरोबर संघटनेची प्रादेशिक शाखा सर्व बाबतीत स्वयंपूर्णतेने उभी राहावी, यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करणे, ही प्रदेश स्तरावरची जबाबदारी निभावणार्‍या कार्यकर्त्यांची अपेक्षित भूमिका होती. विदर्भात ही भूमिका दत्ताजी डिडोळकर यांनी अतिशय समर्थपणे निभावली.

 

संघटनेची सदस्यता वाढविणे, विविध स्तरांवर संघटनेच्या समित्या स्थापन करणे, विद्यार्थीसमूह, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य, विद्यापीठाचे अधिकारी, कुलगुरु अन्य विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते, तसेच सार्वजनिक क्षेत्रातले प्रमुख नेते असा सर्व स्तरांवर व्यक्तिगत संपर्क निर्माण करण्याचे काम दत्ताजींनी अतिशय कुशलतेने केले. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळया समस्यांशी संबंधित सर्व घटकांच्या समन्वयातून उकल करणे, विद्यार्थीवर्गात राष्ट्रभावनेचा जागरण घडविणारे विविध कार्यक्रम उपक्रम घडवू आणणे इत्यादीच्या आयोजनाचा आदर्श वस्तुपाठ दत्ताजींनी आपल्या कार्यशैलीतून घालून दिला. विधी महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचेे आणि नित्य अध्यापनाचे योग्य वेळापत्रक तयार व्हावे, यासाठी केलेली आंदोलने, निवासी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पदवीचा दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी, यासाठी झालेली आंदोलने तसेच स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे उपोषण यासारखी अनेक आंदोलने त्यांनी यशस्वी केली.

 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्‍नांपासून देशासमोरील मोठ्या राष्ट्रीय समस्यांपर्यंत जनजागृती घडवून आणण्यात आणि विद्यार्थीवर्गाची संघटित शक्तीद्वारे त्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामी संयोजित करण्यात पुढाकार घेणे, ही अभाविपची आता ओळखच बनली आहे. संघटनेचे हे चरित्र निर्माण करण्याची दीर्घदृष्टी दत्ताजींनी या प्रारंभिक काळातच अंगिकारली होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातील सर्व क्षेत्रातील व्यवस्थांची रचना करताना निव्वळ भारतीय दृष्टिकोन अंगिकारण्याचा आग्रह ’भारतीयकरण उद्योग‘ नावाच्या अभियानाचे आयोजन परिषदेने केले. या अभियानासाठी दत्ताजींनी विदर्भ क्षेत्राचा विस्तृत दौरा केला. याच काळात ’अधिक धान्य पिकवा‘या कृषिविकासाच्या राष्ट्रीय अभियानातही परिषदेने सक्रिय सहभाग घेतला होता.

 

दत्ताजींच्या कल्पक नेतृत्वाखाली गुमथला आणि फेटरी या दोन खेडेगावांमध्ये परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कंपोस्ट खताचे खड्डे खोदण्याचे काम गावकर्‍यांना सोबत घेऊन केले. या स्वयंस्फूर्त रचनात्मक कामाची सरकारी पातळीवर गौरवाने दखल घेतली गेली. आर. आर. दिवाकर नावाच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी नागपूरच्या दौर्‍यात या कामांची पाहणी केली आणि त्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची जाहीर स्तुती केली. सरकारने या कामाची एक लघुचित्रफीत (documentry) बनवून ती प्रसारितही केली होती. आंदोलनात्मक कार्यक्रमाबरोबरच रचनात्मक कामांचा आग्रह संघटनेच्या वैचारिक भूमिकेत, कार्यपद्धतीत आणि त्याद्वारे विद्यार्थी समूहात निर्माण करण्याला अशी अगदी सुरुवातीपासूनच चालना दिली गेली. नागपूरजवळच्या नदीला पूर आला, तेव्हा किनारी भागातील पूरग्रस्त गावांमध्ये पूरपिडीत बांधवांच्या मदतकार्यातही दत्ताजींनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना सहभागी केले. कपडे, औषधे, अन्य वैद्यकीय साहय्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याच्या कामी परिषद कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

१९५० सालच्या विद्यापीठीय परीक्षांपूर्वी विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन मिळवून देण्याचा एक अभिनव कार्यक्रम दत्ताजींनी आयोजित केला. पुढे चौदा वर्षांनी त्यांनी नागपुरात जो व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठीत स्वरुपात चालविला, त्याचाच हा जणू पूर्वावतार होता. नागपूरच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात कलाशाखेतील विविध विषय शिकविणार्‍या ख्यातनाम प्राध्यापकांचे मार्गदर्शन भरविण्याची एक मालिका त्यांनी चालविली. हेतू हा की, सर्व विद्वान आणि कुशल प्राध्यापकांचे मार्गदर्शन सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे उपलब्ध व्हावे. महाल भागातल्या सिटी कॉलेजचे प्राचार्य पांढरीपांडे यांनी या व्याख्यानमालेसाठी आपल्या महाविद्यालयाची जागा उपलब्ध करुन दिली. या व्याख्यानमालेमध्ये एकूण ६४ व्याख्याने आयोजित करण्यात आली. या उपक्रमाची नागपुरात सर्वत्र मुक्तपणे आखणी होणे स्वभाविक होते. अगदीच शैशव अवस्थेत असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या यामुळे व्यापक स्तरावर मान्यता मिळणेही स्वाभाविक होते. परिषदेचे काम हा निव्वळ पोरासोरांच्या शिळोप्याच्या वेळी सामाजिक काम करण्याचा वरवरचा उपक्रम नव्हे, तर अतिशय गंभीरपणे चालविले जाणारे एक सामाजिक आंदोलन आहे, याची खूणगाठ अशी पहिल्या एक-दोन वर्षातच बांधली गेली. त्यामागे होते दत्ताजी डिडोलकर यांचे कुशल, धुरंधर नेतृत्व. परिषदेला अशी मान्यता मिळाल्याचा सार्वजनिक परिणाम अत्यंत महत्त्वाचा होता आणि दत्ताजींनी तो परिणामही संघटनेत सामावून घेण्याची दृष्टी बाळगली.

संघविचारांच्या किंवा हिंदुत्ववादी विचारवंत आणि मान्यवर व्यक्ती तर अत्यंत उत्सुकतेने आणि आत्मियतेने परिषदेच्या मंचावर येणे स्वाभाविक होतेच. मात्र, दत्ताजींनी त्या वर्तुळाच्या बाहेरच्या अनेक मान्यवरांना परिषदेच्या कार्यलयात उपस्थित केले. अशा मान्यवरांची काही नावे पाहिली तरी, दत्ताजींचे संपर्क कौशल्य ठळकपणे ध्यानात येते. मध्य भारत प्रदेशाचे राज्यपाल मंगलदास पकवासा, मुख्यमंत्री रविशंकर शुक्‍ल, गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा, अर्थमंत्री दुर्गाशंकर मेहता, अन्नमंत्री गोपाळराव काळे, केंद्रीय मंत्री आर. आर. दिवाकर.... एवढेच काय, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजर्षि पुरूषोत्तमदास टंडन यांचाही विद्यार्थी परिषदेच्या नागपूर येथील कार्यकर्त्यांशी अनौपचारिक वार्तालापही दत्ताजींनी घडवून आणला होता.

 

दरम्यान, रा. स्व. संघावरील बंदी विनाशर्त उठली. सर्व प्रकारच्या तपासण्या आणि न्यायालयीन प्रक्रियांमधून गांधीजींच्या हत्येशी संघाचा काहीही संबंध नसल्याचा निष्कर्ष जाहीर झाला. संघाचे काम पूर्ववत सुरू झाले. दत्ताजीही आपल्या मूळ कार्यक्षेत्रात दक्षिण भारतात परतले. आता त्यांच्यावर सेलम, मदुराई आणि त्रिवेंद्रम (आजचे तिरुअंनतपुरम) या तीन जिल्ह्यांचे प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. बंदीकाळात झालेली संघकार्याची पिछेहाट भरून काढणे, गांधीहत्येच्या आरोपामुळे समाजाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आणि स्वयंसेवकांचे खचलेले नीतिधैर्य पुनर्प्रस्थापित करणे अशा कामांमध्येे सारे संघप्रचारक अग्रेसर झाले. दत्ताजींचा अ. भा. विद्यार्थी परिषदेतील सहभागाचा अध्याय तूर्त स्थगित झाला, संपला मात्र नाही. दहा-बारा वर्षांनंतर तो पुन्हा सुरू व्हायचा होता.

-अरुण करमरकर

@@AUTHORINFO_V1@@