आत्महत्त्याग्रस्त शेतकर्यांच्या परिवाराला पिको फॉल मशीन व सायकल भेट
जळगाव, ५ जुलै
आत्महत्त्या केलेल्या शेतकरी परिवारातील ३ गृहिणींना जळगावची समाजसेवी संस्था ‘भरारी फाउंडेशन’ तर्फे ‘शेतकरी संवेदना अभियान’ उपक्रमात पिको फॉल मशिन व सायकल मदत देण्यात आली.
उद्योजक माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांच्या सहकार्याने त्यांचा मुलगा रुपम याच्या विवाहप्रसंगी वधूवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील बोरवीलच्या प्रमिला हरिष पाटील, शहादा येथील मीनाक्षी कैलास भावसार व अमळनेर येथील दिपाली मनोज पाटील यांना पिको फॉल मशीन देण्यात आले. जेणेकरुन त्यांना घरबसल्या व सहजगत्या रोजगार मिळेल. तसेच एरंडोलच्या बी. डी. एस. पी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षाला शिकणार्या आणि घरापासून अंतुर्ली ते महाविद्यालयापर्यंत पायी जाणार्या श्रद्धा पाटील या विद्यार्थिनीला सायकल भेट देण्यात आली. याप्रसंगी ज्योती लढ्ढा, फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, विनोद ढगे, अक्षय सोनवणे, गोपाळ कापडणे, रितेश लिमडा, मोहित पाटील आदी उपस्थित होते.