भारत व इस्राईल द्विपक्षीय भागीदारीस उज्ज्वल भविष्य : महामहिम कार्मन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2018
Total Views |
 
 
 
पुणे : भारत व इस्राईलमधील असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नात्यामुळे ही द्विपक्षीय भागीदारी दिवसेंदिवस अधिकाधिक सशक्त होत आहे, असे मत इस्राईलचे भारतामधील राजदूत महामहिम डॅनियल कार्मन यांनी आज व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स अनॅलिसिस (वायसी-निसदा) विभागामार्फत "इंडिया अँड इस्राईल, अ मल्टीफॅसेटेड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'' या विषयावर कार्मन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
 
या कार्यक्रमास मा. प्र. कुलगुरू डॉ एन एस उमराणी, मा. कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय खरे व मुंबईतील इस्राईलच्या दूतावासामधील राजकीय अधिकारी व विशेष प्रकल्प अधिकारी श्री अनय जोगळेकर उपस्थित होते.
 
 
"पारंपारिक शीतयुद्ध आणि अलिप्ततावादी चळवळ, पाश्चिमात्य गट व कम्युनिस्ट गट अशा गटांभोवती केंद्रित झालेले जागतिक राजकारण हे गेल्या काही दशकांत बदलले आहे. केवळ लष्कराचे सामरिक सहकार्य असलेल्या गटांच्या राजकारणाची जागा आता शिक्षण, पर्यावरण, आरोग्य अशा अनेकविध क्षेत्रांतील व्यूहात्मक भागीदारींनी (स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स) घ्यावयास सुरुवात केली आहे. विविध देशांमध्ये अशा भागीदारी प्रस्थापित होत आहेत. पारंपारिक भूराजकीय धोरणांच्या पलीकडे जागतिक राजकारणाची वाढलेली व्याप्ती, हे या नव्या काळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या नव्या काळात भारत व इस्राईलमधील द्विपक्षीय भागीदारीस निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे,” अशी भूमिका कार्मन यांनी व्यक्त केली. कार्मन यांनी व्याख्यानानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनीही विस्तृत उत्तरे दिली.
 
तत्पूर्वी, मुंबईतील इस्राईलच्या वकिलातीचे मुख्याधिकारी (काऊन्सिल जनरल) महामहिम याकोव्ह फिंकेलस्टीन यांनी इस्राईलच्या राजनैतिक अधिकाऱ्यासाठी भारतात काम करणे हे आव्हानात्मक व मानाचे असल्याचे मत व्यक्त केले! "इस्राईल व भारतामध्ये असलेल्या अनेक क्षेत्रांमधील सहकार्याच्या पार्श्वभूमीवर भारतात काम करणे मानाचे आहेच; मात्र भारतीय पंतप्रधानांनी इस्राईलल्या दिलेल्या ऐतिहासिक भेटीनंतर ही भागीदारी अधिक विकसित करण्याचे आव्हानही आमच्यापुढे आहे,” असे फिंकेलस्टिन म्हणाले.
 
 
तत्पूर्वी, डॉ. खरे यांनी कार्मन यांचे स्वागत केले. "जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्राईलसारख्या देशाबरोबरील द्विपक्षीय भागीदारी ही अत्यंत संवेदनशील आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्मन यांच्या व्याख्यानानंतर डॉ. शाळिग्राम यांनी विद्यापीठाकडून महामहिम कार्मन यांचे औपचारिक आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@