मुंबई उपनगरीय रेल्वेतून दिवसाला किमान ८० लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही काळात उपनगरी रेल्वेमार्गावर रुळांना तडे जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रेल्वेसेवा वरचेवर विस्कळीत होते. अलिकडेच मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मानखुर्द रेल्वेस्थानकाजवळ रुळाला तडा गेला असताना केवळ कापडाचा तुकडा रुळाला बांधून लोकल चालवली गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
मध्य रेल्वेवर गँगमनच्या ३ ,१९७ जागा मंजूर असून केवळ २०३० जागा भरल्या आहेत, तर सुरक्षितताविषयक अन्य कर्मचाऱ्या च्या ३४५८ जागा मंजूर असून केवळ २७५८ जागांवर भरती झाली आहे. त्यामुळे एकूण १८६७ जागा रिक्त असून ८० लाख प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे. त्यासाठी गँगमन आणि अन्य कर्मचाऱ्याच्या रिक्त जागा ताबडतोब भरा, अशी आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली.