भारती यांनी 2009 साली नर्मदा परिक्रमा केली. अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा उमगली.
‘जनतेला शिक्षण द्या, त्यांना वाढवा, आणि अशा प्रकारेच एक राष्ट्र घडू शकतं,’ हे स्वामी विवेकानंद यांचे वचन आपण फक्त वाचतो. पण, खरचं किती लोक हा विचार प्रत्यक्षात आणतात? अशांची संख्या तशी फारचं कमी. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा विचार आणि त्यासाठी काहीतरी करणं, हे ध्येय-ध्यास पदोपदी बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या भारती ठाकूर यांनी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले. १९८० साली त्यांची आई गेल्यानंतर त्यांनी समाजकल्याणासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी स्वामी विवेकानंद, आद्य शंकराचार्य यांच्यावरचे साहित्य वाचले आणि त्यांच्या विचारात तल्लीन झाल्या. “माणूस म्हणून माझ्यात खरा बदल घडला, तो भगवद्गीता, तुकारामांच्या गाथा वाचून. त्यामुळे काहीतरी केले पाहिजे अशी मनात धडपड होती,” असं भारती सहज बोलून गेल्या.
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरकारी नोकरी करत असतानाच त्यांनी त्यांच्या समाजकार्याला सुरुवात केली. “विवेकानंद केंद्राच्या वतीने माझं पाहिलं पोस्टिंग आसाममध्ये होते. तिथे गेल्यानंतर त्यांची भाषा मला समजत नव्हती व माझी भाषा त्यांना समजत नव्हती. अशा परिस्थितीत काम करावे लागले. पोटार्थी जगायचे यापेक्षा ‘समाजासाठी काहीतरी करू या’ ध्येयाने मी पछाडले होते. आसाममध्ये आंदोलन पेटले होते. ‘उल्फा आंदोलना’चा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. या आंदोलकांकडून मला धमकावण्याचे प्रकार झाले. मात्र, मी माझ्या कार्यापासून ढळले नाही. माझे काम चांगले आहे, हे जेव्हा आंदोलकांना समजले त्यावेळी त्यांनीच माझ्या कार्यात मदत केली. या प्रकल्पामधूनच माझ्या जीवन शिक्षणाची सुरुवात झाली, असे म्हणता येईल,” असं भारती आपल्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगतात.
भारती यांनी २००९ साली नर्मदा परिक्रमा केली. अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा उमगली. पाच महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. त्यातूनच त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिलं. अवघी पाच-सात वर्षांची ही मुलं घाटात फिरून फुलं विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळं वास्तव पाहून भारती यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. त्यांनी स्वत:ला या कामात वाहून घेतलं, इतर सगळा मोह विसरुन त्या ‘शिक्षादूत’ झाल्या. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. हातावर मोजता येतील अशी मुलं या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ १७०० मुलं आहेत. “आपण लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालेले पाहताना आनंद होतो,” असं भारती हसत हसत म्हणाल्या.