शाळांची अवस्था सुधारा: प्राचार्य डॉ.एस.एस.राणे
भयावह वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि नैराश्यग्रस्त पिढीला सुखी, समाधानी, आनंदी करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जावे. मनपा शाळांमधून चांगले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जावे, असे आवाहन लवकरच मनपात सत्ता सांभाळणार्या सर्वपक्षीय मान्यवरांना डॉ. डी. जी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांनी केले आहे.
१९८१ पासून प्राध्यापक आणि २००९ पासून प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातला परोपकारी, संवेदनाक्षम माणूस अधिकाधिक सक्रिय होत आला आहे. त्यांचे अनोखे रूप आहे विद्यार्थी सहाय्यक समिती. ग्रामीण, निमशहरी परिवारातील गरजू, होतकरू आणि विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व्यवस्था करताना त्यांनी शेकडो हात आणि मनांना साद घातली आहे. त्यांच्याही आयुष्यात दानशूरता व सेवाभाव जागवला आहे. या उपक्रमात आणि कमवा व शिका योजना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राबवण्यात अग्रेसर असलेल्या राणे सरांनी गेल्या २० वर्षात अशा ४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात गतिमान करीत जणू नवजीवन, नवदृष्टी दिली आहे. महागड्या औषधीला पर्यायी जेनेरिक औषधी जनमानसात पोहोचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. रामानंदनगरात जेनेरिक औषधी विक्री केंद्रासह नाममात्र दरात समितीतर्फे दवाखाना सुरू करून त्यांनी समाजाला नवा विचार दिला आहे.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण भारतने साधलेल्या सुसंवादात प्राचार्य एस. एस. राणे म्हणाले की, चांगले रस्ते, पुरेसा वीज व पाणीपुरवठा, कचरामुक्त आणि सुंदर, स्वच्छ, हिरवेगार शहर अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवावा. शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षक व पालकांनाही प्रवृत्त करावे, असा तळमळीचा विचारही प्रा. डॉ. राणे यांनी मांडला.