अंबरनाथ - मुसळधार पावसाने धरणे भरभरून वहात असताना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलानी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच महिलांनी आंदोलन मागे घेतले. अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पुरेसा पाणी पुरवठा नाही, उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ सहन केली आता पावसाळा सुरु झाला, धरणे भरली आता तरी पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा होती मात्र घरात केवळ दहा मिनिटे पाणी पुरवठा कमी दाबाने होतो त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्याची वेळ आल्याची तक्रार परिसरातील महिलांनी केली. पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी या मागणीसाठी आज सोमवारी पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला पण कोणी अधिकारी भेटले नाहीत त्याच वेळी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करण्याचा निर्धार करून आज सोमवारी महिलांनी आंदोलन केले.
पाण्याच्या टाकीवर महिलांचे आंदोलन सुरु असल्याची माहिती समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, सरचिटणीस अविनाश सुरसे, भाजपाच्या महिला अध्यक्षा सुजाता भोईर, संजीवनी कातकर आदींनी आंदोलन करणाऱ्या महिलांशी चर्चा केली आणि अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यात सुधारणा व्हावी अशी मागणी महिला आणि नागरिकांनी केली. शिवगंगानगर परिसरात ७८ कोटी रुपये पाणी योजनेतून जलकुंभ बांधण्यात आले आहेत. मात्र टाकीपर्यंत पाण्याचा पुरवठा योग्य रीतीने होत नसल्याने पाणी टंचाई भेडसावत असल्याचे श्री. कुणाल भोईर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी, एन. डी. पाटील , वायदंडे यांनी शिवगंगानगरला भेट दिली. अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यात तांत्रिक सुधारणा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. शिवगंगानगरला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायम स्वरूपी तोडगा काढावा अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याला देण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक रविंद्र पाटील यांनी दिली.