भाजप कार्यालयात ना.गिरीश महाजन यांची माहिती
जळगाव, ४ जुलै :
नाथाभाऊ आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. मनपाची निवडणूक त्यांच्याच नेतृत्त्वाखाली लढविली जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली. जळगाव मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी भाजप कार्यालयात सकाळपासून गर्दी केल्याने परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यासाठी २७३ इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह मुलाखती दिल्या. मुलाखतीला पक्षाचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, मंडलाध्यक्ष, महिला वर्ग, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शैक्षणिक सामाजिक व विविध क्षेत्रातील इच्छूक उमेदवार उपस्थित होते.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास खा.ए.टी.पाटील, भाजप शहर जिल्हाध्यक्ष तथा आ.सुरेश भोळे आ.स्मिताताई वाघ, आ.चंदूलाल पटेल, माजी आ.गुरूमुख जगवाणी, विशाल त्रिपाठी, महिला शहर अध्यक्षा जयश्री पाटील, युवा मोर्चाध्यक्ष जितेंद्र मराठे, ऍड.किशोर काळकर, सुनील माळी आदी उपस्थित होते.
मनपाच्या निवडणुकीसाठी युती झाल्यावर जागांचे वाटप, कोणाला किती व कोणत्या प्रभागात कोणाचा उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब होईल. असे वाटत असतांना मंगळवारी भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक सुरू होण्यास बराच विलंब झाला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार असून त्यानंतर युतीत कोणाला किती व कोणत्या प्रभागातील जागा सोडायच्या यावर दोन दिवसांनी निर्णय होईल.
सुरुवातीला आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहोत. मुलाखतीसाठी जवळपास २५० ते ३०० उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. ह्या मुलाखती दोन दिवस सुरु राहतील. त्यानंतर छानणी करण्यात येईल, असे ना.महाजन म्हणाले. यानंतर शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर कोणत्या पक्षाचा व कोण सक्षम आहे. हे ठरवून कोणाला किती कोणत्या प्रभागात जागा देण्यावर चर्चा झाल्यावर जागा वाटप करण्यात येतील असेही ते म्हणाले.
नाथाभाऊ येणार की नाही यावर ते म्हणाले की, आ.नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार आहे. मुक्ताईनगर नगर पंचायतीचा प्रचार नारळ फोडला गेला असल्याने नाथाभाऊ येऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्यात असे कोणताही वाद नसून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र सकाळपासून युती नको, अशी चर्चा कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. तसेच नाथाभाऊंचा या युतीला विरोध असल्याचे यावेळी कार्यकर्त्यामध्ये चर्चा रंगली होती. त्यामुळेच नाथाभाऊ बैठकीला येणार नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती.
भाजप कार्यालयासमोर दोघांमध्ये बाचाबाची
कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतांना भाजप कार्यालयासमोर बसलेल्या कैलास सोनवणे, अशोक लाडवंजारी, आबा बाविस्कर, अश्विन सोनवणे, दिलीप बाविस्कर यांच्याजवळ त्यांचे समर्थक बसलेले होते. यावेळी मयत सोनवणे यांचा भाऊ पंकज सोनवणे त्याठिकाणी येवून काहीतरी बोलल्यावरून कैलास सोनवणे व पंकज सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद वाढणार असे दिसत होते. मात्र कार्यकर्त्यांनी यावर पडदा टाकला. ही घटना शहर पोलिसांना समजताच घटनास्थळी येवून प्रथम वाहतुक सुरळीत करून काही होवू नये म्हणून गोपीनीय कर्मचार्यांनी त्याठिकाणी बंदोबस्ताला ठेवला होता.
विलंबामुळे नेत्यांच्या उपस्थितीची चर्चा
उपस्थित सर्वजण ना.गिरीश महाजन आणि आ.एकनाथराव खडसे यांच्या आगमनाची वाट पाहत होते. आता निघाले आहे... पोहचत आहे... अशा चर्चा भाजप कार्यालयात सकाळापासून सुरू होत्या. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ना.गिरीश महाजन यांचे आगमन झाले.
वाहतुकीचा खोळंबा
सकाळपासून भाजप कार्यालयात कार्यकर्त्याची व नेत्यांची गर्दी असल्याने बळीराम पेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची गर्दी होती. यामुळे सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास छोटे कंटेनर पत्री हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी येथून जात असतांना गर्दीत अडकले. त्यात एक रूग्णवाहिका असल्याने ती या गर्दीत अडकली. त्यामुळे बराच काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. असे दोन ते तीन वेळा झाले. यावेळी वाहतूक कर्मचारी याने येवून तो मार्ग मोकळा करतांना दिसत होता. ते रस्त्यावर लागलेल्या नेत्यांच्या गाड्या कोणीच काढण्यास तयार नव्हते. एका महिलेने त्याची तक्रार भाजप कार्यकर्त्याकडे केल्यावर तिच्यावर रोष व्यक्त करण्यात आला.