मुंबई: मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांची पटसंख्या घटल्याने नजीकच्या शाळांमध्ये विलीनीकरण केले जात आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवीचे ७ नवीन वर्ग आणि इयत्ता आठवीचे १०३ नवीन वर्ग लवकरच सुरू करण्यात आले आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी शिक्षण समितीच्या बैठकीत येणार आहे.
यामुळे इयत्ता पाचवीच्या ३९९ तर आठवीच्या २१ ,६४० जागा वाढल्या असून विद्यार्थ्यांना पालिका शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. इयत्ता पाचवीच्या नवीन ७ वर्गांमध्ये, हिंदी माध्यम १ , उर्दू - ४ , तामिळ - १ आणि कन्नड - १ अशा वर्गांचा समावेश आहे. इयत्ता आठवीचे १०३ नवीन वर्ग सुरू करण्यात आले असून त्यामध्ये, मराठी माध्यम-२५ , हिंदी- ३० , इंग्रजी- ८ , उर्दू- १८ , तामीळ-२ , तेलुगू-५ , गुजराती-६ , कन्नड-९ आदी वर्गांचा समावेश आहे. शासनाच्या ’मोफत व सक्तीचे शिक्षण‘ या कायद्यांतर्गत पालिकेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र, इयत्ता चौथी व सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध होण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे जे विद्यार्थी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये महागडे शिक्षण घेऊ शकत नाहीत, ते शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पालिका शिक्षण विभाग आवश्यकतेनुसार दरवर्षी तुकड्या वाढवते.