विक्रम-वेताळ आणि जळगाव रणसंग्राम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
पराक्रमी व बुद्धिमान राजा विक्रम त्या जंगलातील वेताळ नामक पिशाच्चास पकडण्यासाठी निघाला होता. त्या घनदाट जंगलात राजा विक्रम बेसावध पाहून तो वेताळ राजाच्या पाठीवरच येऊन बिलगला आणि मोठमोठ्याने खिदळत राजास बोलू लागला... राजा, तू हुशार आहेस. विद्वान आहेस. मनुष्याची पारख तुझ्याइतकी कोणालाच करता येणं शक्य नाही, हे मला ठाऊक आहे. मग मला आता सांग, जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी हे काय राजकारण शिजत आहे? ’भाऊ’ काही दिवसांपूर्वी रेल्वे इंजिनातून उतरुन ’दादां’च्या शिवाजीनगरात दाखल झाले होते. तिथे त्यांनी दादांसोबत हातमिळवणी केली होती आणि आता एक आठवडाही होत नाही तो लगेच भाजपात प्रवेश करते झाले आहे. तिकडे घड्याळवालेही भाजपाचा रस्ता धरत आहेत. यामागे काय राजकारण असू शकते? आणि खाविआ- भाजप युती होईल, की नुसतीच अफवा ठरेल?’ राजा, तू माझ्या या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर ठीक, नाहीतर मी तुझी शकले शकले करुन टाकीन! आणि याद राख...जर तू उत्तर बोलून सांगितले, तर मी पुन्हा उडून जाईन.
 
राजाला काहीही करून त्या वेताळाला जंगलाच्या बाहेर काढायचे होते. कारण एकदा का तो जंगल पार करुन त्याच्या पुण्यनगरीत शिरला की त्या वेताळची शक्ती संपलीच म्हणून समजा. म्हणून राजाने युक्ती केली, की वेताळाला बोलण्यात गुंतवून ठेवायचं आणि जंगलातून लवकर बाहेर पडायचं. राजाने बोलण्यास सुरुवात केली.
 
बघ वेताळ... यावर्षी जळगाव मनपाच्या ७५ जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्यावेळी एकट्या खाविआने ३४ जागा मिळवल्या व तो सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. यंदा भाजपा खाविआसोबत युतीसाठी आग्रही असल्याचे दर्शवत आहे. पण, भाजपाला मात्र एकट्याला ४० जागांची अपेक्षा आहे. पण गेल्यावेळी जो पक्ष सर्वात मोठा ठरला होता, तो आज भाजपाचा लहान भाऊ का होईल? त्यामुळे खाविआ भाजपासोबत जाईल का यात शंकाच आहे. त्यातच जिकडे तिकडे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. जनता भाजपाला कौल देतेय. केंद्रात व राज्यातही भाजपाची सत्ता. मोदीलाट अजून ओसरल्याचे काही चिन्हं दिसत नाही. तेव्हा मोदी लाटेत एकहाती सत्ता मिळत असताना व खाविआशिवाय कुठलाही तगडा प्रतिस्पर्धी नसताना भाजपावाले युती का करतील? त्यामुळे युती हे केवळ प्रतिस्पर्ध्याचा वेळ घालवण्याचे तंत्र आहे. जे भाजप व खाविआ दोघे एकमेकांविरोधात आजमावत आहेत. त्यामुळे युती केवळ एक थोतांड आहे, याची जाणीव बहुधा ’भाऊं’ना झाली असावी. म्हणूनच त्यांनी भाजपाची वाट धरली. परंतु भाजपातील मुत्सद्देगिरांनी भाऊंना सरळ आत न घेता व्हाया शिवाजीनगर बोलावले. जेणेकरुन दादांचे खच्चीकरण होईल व भाजपाचे वर्चस्व निर्माण होईल. पण भाऊदेखील चतुर आहेत. त्यांनी आपले सहा सैनिक शिवाजीनगरातच ठेवले आहेत, जे त्यांना भविष्यात मदत करु शकतील.
 
या सगळ्यात बिकट अवस्था आहे ती कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची. कॉंग्रेसला तर गेल्यावेळी भोपळादेखील फोडता आला नव्हता, तर राष्ट्रवादीनेही जेमतेम जागा मिळवल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीचा वेळ खराब चालू आहे. त्यामुळे घड्याळास कमळाची ओढ लागल्यास त्यात नवल नाही. म्हणूनच, घड्याळ असो वा रेल्वे इंजीन दोघेही भाजपाच्या दिशेने धाव घेताय.
 
आपल्या नगरीत शिरण्याच्या आत राजाचे उत्तर संपले आणि वेताळ मात्र मोठमोठ्याने हसू लागला. राजा...तू उत्तर अचूक दिलेस. पण मी तुला बोलण्याची मनाई केली होती, असे बोलून वेताळ पुन्हा त्या घनदाट जंगलात गायब झाला.
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
@@AUTHORINFO_V1@@