वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

    28-Jul-2018
Total Views |
इयत्ता चौथीच्या वर्गात पूर्वी एक कविता होती. ‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.’ कवि दामोदर कारेंची हीच ती कविता. या कवितेने राजकारण्यांवर फारच छाप पाडली असावी का? कारण, एका पक्षातून दुसर्‍या पक्षात नेतेमंडळी अशी काही प्रवेश करतात जणू वार्‍याच्या मंद झुळकेने या बागेतून त्या बागेत सहज स्वच्छंद प्रवेश करावा. कधी रणमैदानातील धनुर्धार्‍याच्या हातातील धनुष्यबाणास स्पर्श करावा, तर कधी गिरीपर्वत गाठून कमलपुष्पास फुलवून संतुष्ट करावे.
 
वार्‍याची मंद झुळूक होऊन जिथली ओढ लागेल तिकडे स्वच्छंदपणे झुकावे, हव्या त्या पक्षात प्रवेश करावा व इच्छा झाल्यास पुन्हा बाहेर पडावे. अशीच काहीशी स्थिती राजकीय नेतेमंडळींची झाली आहे. कधी शिवसेनेसोबत, तर कधी भाजपासोबत. कधी रेल्वेचं इंजिनच धरावं, तर कधी बंद घड्याळाच्या काट्यास नाजूक फुंकर घालून त्याला चालते करावे. असा हा त्यांचा बेधुंद प्रवास या कवितेचा त्यांच्या मनावरील पगडा दर्शवतो. पण या त्यांच्या स्वच्छंदी व स्वैरपणाबाबत कवी दामोदर यांनाच जबाबदार धरुया. कवी दामोदरांनी इतकी मनाला भावणारी कविता तरी का लिहावी, की लोक पक्षनिष्ठा सोडून मुक्तपणे पक्षत्याग करतील व स्वैर होतील. म्हणून या पक्षीय कोलांटउड्या कवी श्री दामोदर कृपेनेच होत आहे, असे कुणी म्हणेल तर ते गैर का ठरावे? कारण या कवितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींच्या मनात ‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, ओढ घेईल मन त्या पक्षात शिरावे’ अशी महत्त्वाकांक्षा फुलवणारी काव्यपंक्तीच जणू तयार झाली आहे.
 
अशी ही कवि दामोदरकृत प्रभावी कविता जळगांवी प्रवेश करती झालीय म्हणे. म्हणजे जळगांवातील अनेक राजकीय नेत्यांच्या ती वाचनात आलीय म्हणे. आणि पाहता पाहता या कवितेने छाप पाडलीय ती चक्क ललित कोल्हे यांच्यावर! अहो...आश्चर्य कसलं त्यात? त्याशिवाय काय ललितभाऊ कोल्हे इतके ‘स्वैर’ झाले आहेत? आता बघा ना... मागच्याच आठवड्यात ‘भाऊं’नी म्हणे मनसेची साथ सोडून ‘दादां’च्या गोटात प्रवेश केला. ‘भाऊं’सारखा धुरंधर नेता आपल्या पक्षात आल्याचा ‘दादा’ समर्थकांनी असा काही जल्लोष केला, जणू दादांनी निवडणूकच मारली. लाडू-पेढ्यांना काही सुमार राहिला नाही. पण झाले उलटेच. जिभेवरुन लाडूची गोड चव उतरत नाही व गुलाबी ढग निवळतही नाही, तोवर गुलालाने भिजलेल्या अंगाने ‘भाऊ’ गिरीश पर्वतावर हजर!
गोड जीभ आंबट झाली. कवी श्री दामोदर ‘भाऊं’वर पुन्हा प्रसन्न झाले. ‘भाऊं’ना कवितेने पुन्हा भुरळ पाडली व भाऊ भाजपात प्रवेश करते झाले. यामुळे काही जण दुखावले तर काही सुखावले. पण ‘दादां’वर मात्र कुठलाच परिणाम नाही! होणार तरी कसा? कवि श्री दामोदर यापूर्वी ‘दादां’इतके कुणावरही प्रसन्न झालेले नाही. तसा इतिहासच आहे त्यांचा.
 
 
‘भाऊ’ आता झुळूक होऊन गिरीश पर्वतावरील कमळबागेतील कळ्यांची फुले फुलवणार म्हणे. कमल बागेतील आनंद लुटणार. गिरीश पर्वतावरील सैर करणार. भाऊ तसे रसिक व स्वच्छंदी आहेत हे कुणीही मान्य करेल. तसा भाऊंनी महापौरांच्या सिंहासनारुढ होण्याचाही आनंद अनुभवलाय. आता त्यांचं स्वच्छंदी मन त्यांना पुढे कुठे घेऊन जातं, हे सांगता येणं तूर्तास अशक्यच. कारण, वारा असो वा राजकीय नेते, त्यांचा भावी प्रवास सांगणारा देवच म्हणावा. पण मतदारांनी ही कविता न वाचलेलीच बरी. सानुली मंद झुळूक होऊन जनतेने स्वैर होऊन वाटेल त्याला मत दिले तर पश्चात्तापाचे काळेकुट्ट ढग त्यांच्या डोक्यावरुन कधीही हलणार नाही. तेव्हा कवी श्री दामोदरांची माया राजकारणी लोकांपुरतीच मर्यादित राहिलेली बरी!.
 
 
 
 
- कल्पेश गजानन जोशी
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.