दरम्यान, काही शाळांमध्ये जागेच्या अभावी आठवी ते दहावीपर्यंत वर्ग भरत नाहीत. हे विद्यार्थी गरजू व गरीब वर्गातील असल्याने माध्यमिक शिक्षण बाहेरुन घेणे, परवडत नाही. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर सुरू होणार्या लहान शिशुवर्ग ते दहावीपर्यंतचे सलग शिक्षण मिळावे, यादृष्टीने पालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत केली आहे.
पालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरतो आहे. विद्यार्थी गळतीही वाढल्याने बहुतांश शाळा बंद पडल्या आहेत, तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालकांचा इंग्रजीकडे असलेला कल वाढत आहे. तसेच विद्यार्थीसंख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने सार्वजनिक व खासगी सहभागाने (पीपीपी) तत्त्वावर लहान शिशुवर्ग ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता ३५ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शाळांमध्ये खासगी संस्थांचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणार्या मोफत २७ वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.