अंतर्गत वाहतुकीचा वेग वाढावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या संथगती कामांमुळे या भागातील वाहतूककोंडीत भर पडत आहे. हे पूल मे महिनाअखेरीस पूर्ण करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र अपुर्या कामांमुळे पूल नवीन मुदतीत पूर्ण होणार का? अशी शंका व्यक्त होत आहे. शहरातील अंतर्गत भागात होणारी वाहतूककोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उड्डाणपुलांच्या कामांसाठी तब्बल २२७ कोटी रुपयांची रक्कम महानगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे वर्ग केली असून स्थानिक प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे सुरू आहेत. आयुक्त जयस्वाल आणि चव्हाण यांच्या सूचनांनंतरही मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे पूल पूर्ण झालेले नाहीत. तसेच येथील कोंडी कमी होईल यासाठीदेखील फारसे उपाय आखले गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी नुकतीच महापालिका अधिकाऱ्याची एक बैठक घेऊन नव्याने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करा, असे आदेश काढले आहेत.