बर्लिन भिंतीचे बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

 

पॉटस्डॅम सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च या सरकारमान्य इतिहास अध्ययन संस्थेने आता बर्लिनची भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात किती लोक ठार झाले, किती पकडले जाऊन जन्मठेप भोगायला गेले, याचा अभ्यास चालवला आहे.
 

कोणत्याही दुर्घटनेतल्या मृतांचा नक्की आकडा सांगणं, ठरवणं हे काम फार अवघड असतं. पण, जर्मनीतल्या एका सरकारमान्य अध्ययन संस्थेने हेच काम हाती घेतलं आहे. बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करताना १९६१ ते १९८९ या २८ वर्षांच्या काळात एकंदर किती लोक ठार झाले, याचाच अभ्यास ही संस्था करीत आहे.

 

१९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात, जर्मनीवर दोन दिशांनी दोन प्रचंड सैन्य आक्रमण करून येऊ लागली. पश्चिमेकडून ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स यांची संयुक्त सेना जर्मन राजधानी बर्लिनच्या रोखाने निघाली होती, तर पूर्वेकडून सोव्हिएत रशियाची लाल सेना, दोस्तांच्या सेनेआधी बर्लिनवर कब्जा करायचाच, अशा निश्चयाने मुसंड्या मारत निघाली होती. या शर्यतीत अखेर जर्मनीची फाळणी झाली. दोस्त सैन्याने व्यापलेला जर्मनीचा पश्चिमेकडचा प्रदेश हा ‘पश्चिम जर्मनी’ या नावाचा स्वतंत्र देश झाला, तर सोव्हिएत सैन्याने व्यापलेला जर्मनीचा पूर्वेकडला प्रदेश हा ‘पूर्व जर्मनी’ या नावाने स्वतंत्र देश बनला. पण, एवढ्यावरही भागलं नाही. जर्मन राजधानी बर्लिनचीही फाळणी झाली. सोव्हिएत सैनिक पूर्वेकडच्या नागरिकांना पश्चिमेकडे येऊ देईनात. काही काळ तर त्यांनी संपूर्ण बर्लिन शहराचीच कोंडी केली. सर्व रस्ते, रेल्वेमार्ग रोखून धरले. बर्लिन कुणाचं, या प्रश्नावरून अँग्लो-अमेरिकन विरुद्ध सोव्हिएत रशिया यांच्यात आता युद्ध पेटतं की काय, असा प्रसंग निर्माण झाला, पण सुदैवाने तो टळला. अमेरिकन विमानांनी बर्लिनच्या नागरिकांना विमानातून अन्न पाकिटं फेकून दिलासा दिला.

 

पुढे हा तणाव निवळला. पण, फाळणी पक्की झाली. हिटरलच्या ‘गेस्टापो’ या कुप्रसिद्ध गुप्त पोलीस खात्यानंतर पूर्व जर्मनीच्या नागरिकांच्या कपाळी आता साम्यवादी शासनाच्या गुप्त पोलिसांचा ससेमिरा आला. ’स्तासी’ या नावाचं हे साम्यवादी गुप्त पोलीस खातं ‘गेस्टापो’इतकंच, किंबहुना कांकणभर जास्तच क्रूर होतं. पूर्व जर्मनीतल्या लोकशाहीवादी नागरिकांना वेचून काढून कैद करण्याचा, त्यांच्यावर खटले भरण्याचा नि त्यांना सरकारविरोधी ठरवून गोळ्या घालण्याचा धडाका सुरू झाला. साहजिकच पूर्व जर्मन नागरिक पश्चिमेकडे स्थलांतरित होण्याचा विचार करू लागले. स्तासीच्या लोकांना नवीन काम मिळालं. स्थलांतर करू पाहणाऱ्या गोळ्या घालण्याचं.

 

१९६१ साली तर कहरच झाला. पूर्व जर्मन लष्कराच्या कडक पहार्याला चुकवून, हर प्रयत्नांनी, नागरिक पश्चिमेकडे पळतात, असे निदर्शनाला आल्यामुळे, पूर्व जर्मन सरकारने बर्लिन शहराच्या आपल्या ताब्यातल्या भागाला चक्क काटेरी तारांचं कुंपणच घातलं. नंतर क्रमाक्रमाने या कुंपणाच्या जागी भिंत उभी राहिली. हीच ती कुप्रसिद्ध बर्लिन भिंत. या भिंतीला टप्प्याटप्प्यांवर टेहळणी बुरुज होते. त्या बुरुजांवरून अखंड पहारा असायचा. रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशाचे झोत सर्वत्र फिरत असायचे. भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करणार्याला सरळ गोळी घातली जायची. अधिकृतपणे सरहद्द ओलांडण्यासाठी काही ठराविक ठिकाणी भिंतीला दरवाजे होते. तिथे कडक तपासणीनंतरच माणसं सोडली जायची.

 

एवढा कडक बंदोबस्त असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याचे प्रयत्न व्हायचेच. क्वचितच एखादा माणूस बचावायचा. मशीनगन्सच्या मार्यातून कोण वाचणार? ख्रिश्चन बुटकूस आणि त्याची बायको ईल्स यांचंच उदाहरण घ्या. ही दोघं पूर्व जर्मनीतल्या एका प्रयोगशाळेत केमिस्ट म्हणून काम करत होती. एका बर्फाळ रात्री त्यांनी भिंत ओलांडून पश्चिमेकडे जाण्याचा प्रयत्न केला. बर्फामुळे सगळे वातावरण धूसर पांढरं झालं होतं. आपले केमिस्टचे पांढरेशुभ्र कपडे घालून आपण त्या वातावरणात मिसळून जाऊ, असा त्यांचा हिशेब होता. पण तो साफ चुकला. एका क्षणात ख्रिश्चन बुटकूसच्या दिशेने दहा मशीनगन्स धडधडल्या, त्याच्या देहाची अक्षरशः चाळणी झाली. मरणोत्तर शवतपासणीत त्याच्या शरीरात १९९ गोळ्या मिळाल्या. ईल्स जखमी होऊन पकडली गेली आणि स्तासींच्या तुरुंगात खितपत पडली. अशी शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आहेत.

 

‘पॉटस्डॅम सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’ या सरकारमान्य इतिहास अध्ययन संस्थेने आता भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात किती लोक ठार झाले, किती पकडले जाऊन जन्मठेप भोगायला गेले, याचा अभ्यास चालवला आहे. १९६१ साली काटेरी तारांचं कुंपण या स्वरूपात उभी राहिलेली कुप्रसिद्ध बर्लिन भिंत १९८९ साली कोसळली. सोव्हिएत रशियाचं साम्राज्य कोसळल्यामुळे पूर्व युरोपातल्या सर्वच साम्यवादी सत्ता एकापाठोपाठ एक कोसळल्या. त्यात पूर्व जर्मन सरकारचीही पाळी आली. बर्लिन भिंत कोसळली. पूर्व जर्मनी-पश्चिम जर्मनी ही कृत्रिम फाळणी संपवून जर्मनी एकवटला. म्हणजे बर्लिन भिंत २७ वर्षे उभी होती. पाव शतकाच्या या कालखंडात किमान १ लाख लोकांनी भिंत ओलांडून पश्चिमेकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला असला पाहिजे, असा प्राथमिक अंदाज पॉटस्डॅम अध्ययन संस्थेचे संचालक हान्स हरमान यांनी व्यक्त केला आहे. यापैकी किती ठार झाले आणि किती पकडले गेले, याचा कसून शोध सुरू आहे. त्यासाठी स्तासी गुप्त पोलीस खात्याच्या अवाढव्य आकाराच्या दस्तऐवजांचा धांडोळा घेतला जात आहे.

 

बर्लिन भिंतीचे शेवटचे दोन बळी निश्चितपणे समजले आहेत. फेब्रुवारी १९८९ मध्ये पूर्व जर्मन सरकारचे पतन अगदी अटळ झालं होतं, पण प्रत्यक्षात सरकार कोसळलेलं नव्हतं. अशा काळात क्रिस गुफ्रॉय या अगदी तरण्याबांड पोराने भिंत ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्व जर्मन रक्षकांच्या गोळ्यांना बळी पडला.

 

विनफ्रेड फ्रॉइडेनबर्ग हा भिंतीचा शेवटचा बळी. तो बिचारा फारच दुर्दैवी ठरला. मार्च १९८९ मधल्या एका काळोख्या रात्री तो बलूनला लटकून पूर्व बर्लिनमधून उडाला, भिंतीवरचे प्रखर प्रकाशझोत आणि रक्षकांच्या अंधारातही पाहणार्या दुर्बिणी यांना व्यवस्थित गुंगारा देऊन तो पश्चिमेकडे आलाही, पण अंधारात त्याला उंचीचा काहीच अंदाज येईना. अखेर पश्चिम बर्लिनच्या झेहलेनडॉर्फ नावाच्या उपनगरात त्याचं बलून कोसळलं आणि तो ठार झाला. ‘पॉटस्डॅम सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’ ही संस्था आता हा सगळा तपशील साक्षेपाने जमवत आहे. स्वत:ला श्रमिकांचं, कष्टकर्यांचं, शोषितांचं सरकार म्हणविणार्या लोकांनी किती निरपराध लोकांना उगीचच ठार मारलं, हे यातून पुन्हा एकदा सगळ्या जगाला कळेल.

 

प्रचारतंत्र

दुसर्या महायुद्धाच्या काळात चर्चिल आणि रुझवेल्ट यांचा एक किस्सा मोठ्या चवीने सांगितला जायचा. एकदा म्हणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फर्डिनंड रुझवेल्ट अचानक ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निवासस्थानी आले. घरात त्यांना कुणीच दिसेना म्हणून त्यांनी मोठ्याने, “विन्स्टन, विनी...” अशा हाका मारल्या.कुठून तरी चर्चिल यांनी ‘ओ’ दिली. आवाजाच्या अनुरोधाने रुझवेल्ट एका खोलीत शिरले. बघतात तो ती चर्चिलची बाथरूम होती आणि चर्चिल संपूर्ण निसर्गावस्थेत स्नान करीत होते. “ओ! एक्स्ट्रीमली सॉरी” असे म्हणून रुझवेल्ट झटकन वळले. त्यावर चर्चित म्हणाले, “ब्रिटनला अमेरिकपासून काहीही लपवायचं नाही.”

 

हा किस्सा काल्पनिक आहे, हे स्पष्टच आहे. पण, युद्धकाळात तो कमालीचा लोकप्रिय झाला होता. ‘राजशिष्टाचार’ या विषयाची ज्यांना जाण होती किंवा आहे, त्यांना तो किस्सा काल्पनिक असल्याचं लगेच समजतं. पण, बहुसंख्य सुशिक्षित (किंवा खरं म्हणजे फक्त साक्षर!) लोकसुद्धा हा किस्सा म्हणजे खरी घटना समजून चालले होते.

 

असे किस्से मुद्दाम पसरवले जात असतात. युद्धकाळात तर त्याची खरोखरच मानसिक गरज असते. तुम्हाला आठवत असेल तर, १९६५ च्या भारत-पाक युद्धात भारताच्या अब्दुल हमीदने पाकिस्तानचे तीन पॅटन रणगाडे फोडल्याचा किस्सा पुन:पुन्हा हॅमर केला गेला होता. अर्थात, तो किस्सा पूर्णपणे खरा होता. इतकंच नव्हे, तर प्रत्यक्षात त्याने तीनच नव्हे, तर सात पॅटन फोडले होते. पण, पॅटन हा रणगाडा अजिंक्य, अभेद्य असल्याचा गाजावाजा अमेरिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात केला होता की, भारतीय जनता आणि भारतीय सैनिक मनातून जरा धसकलेच होते. तेव्हा पॅटन अभेद्य नाही, हे सर्वांना पुन:पुन्हा कळण्यासाठी ही पराक्रमगाथा तितक्याच मोठ्या आवाजात सांगायला हवीच होती. त्यामुळे त्या वेळेस जनता आणि सैनिक यांचे मनोधैर्य एकदम वाढलं होतं. शिवाय त्या कहाणीला एक सूक्ष्म कंगोरा होताच, लढाई पाकिस्तानशी होती. पाकने अचानक आक्रमण केल्यामुळे लोक संतापलेले होते. नाही म्हटलं तरी सरकारला भारतातल्या मुसलमानांची काळजी होतीच, तेव्हा अब्दुल हमीद या भारतीय सैनिकाने पाकिस्तानचे अभेद्य समजले जाणारे पॅटन फोडले, हा त्या पराक्रमगाथेतला ’अंडरटोन’ महत्त्वाचा होताच. (यात अब्दुल हमीदच्या शौर्याला कोणताही उणेपणा आणण्याचा प्रस्तुत लेखकाचा उद्देश नाही. जो आमच्या मातृभूमीसाठी खर्ची पडला, तो आमचाच!) तात्पर्य काय की, काही उद्देशांनी सत्य, असत्य, अर्धसत्य बातम्या पेरल्या जात असतात. खरे, खोटे किस्से प्रस्तुत केले जात असतात आणि त्याद्वारे जनमानसावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असतो. हे जगभर चालतं. आपल्याकडे तर पार आर्य चाणक्यापासून भगवान श्रीकृष्णापर्यंत अनेक राजनीतिधुरंधरांनी राष्ट्रहितासाठी असे बनाव घडवून आणलेले आहेत. यातला ‘राष्ट्रहितासाठी’ हा शब्द महत्त्वाचा! अलीकडेच एक किस्सा ऐकला. कुणीतरी म्हणे सोनियाजींशी इटालियन भाषेत बोलू लागला. त्यावर सोनियाजींनी म्हणे त्याला चमकावलं, “इंग्रजीत बोला, आपण भारतीय आहोत.” तीर अगदी अचूक मारलेला आहे. भारतातला मध्यमवर्ग हाच शेवटी कोणत्याही राजकीय पक्षाचे भवितव्य घडवित असतो आणि सध्या हा मध्यमवर्ग इंग्रजीसाठी, इंग्रजीपाठी वेडा झालेला आहे. आपली मातृभाषा किंवा राष्ट्रभाषा यांच्याबद्दल त्याला काहीही वाटेनासं झालेलं आहे. श्रीमंत वर्ग तर कायमच इंग्रजाळलेल्या मानसिकतेत जगत असतो आणि आता गरीब वर्गालाही इंग्रजीचं आकर्षण निर्माण होत आहे. संपूर्ण समाजातल्या बहुसंख्य आई-बापांना आपली पोरं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची असतात. तिथे प्रवेश मिळाला नाही तर नाइलाज म्हणून ते पोरांना अन्य भाषिक माध्यमांत घालतात, ही वस्तुस्थिती आहे. अशा समाजाला अपील होण्याची मोठीताकद सोनियाजींच्या वर दिलेल्या दोन वाक्यांत आहे.


@@AUTHORINFO_V1@@