मुंबई : मराठा आरक्षणाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला असून यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत खासदार अशोक चव्हाण यांनी, "मराठा विरुद्ध इतर असे युद्ध पेटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे." असे त्यांनी म्हटले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसतर्फे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री हा मुद्दा चघळवत ठेवत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, सामन्य माणसांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी आंदोलकांना यावेळी दिला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळले, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांकडे इशारा केला. मराठा आंदोलनाशी चर्चा करण्यासाठी सरकारची कोणीही व्यक्ती पुढे आली नाही, सरकारनं आंदोलनाची नीट दखल घेतली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.
आता कृती करून दाखवा :
मराठा आरक्षणावर भाजप-सेना सरकारकडून चर्चेचे गुर्हाळ खूप झाले, आता कृती करून दाखवा, असे आव्हान यावेळी काँग्रेसने सरकारला केले आहे. सरकारनं त्वरित एक विशेष सत्र बोलावून याविषयी चर्चा केली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.