या देशात कुणीही, कुठेही आपल्या श्रद्धेनुसार व्यवहार करू शकतो. हा हक्क घटनेमध्ये आहे. हा हक्क मुख्यमंत्र्याला मराठा क्रांती मोर्चा नाकारत आहे, असे कुणालाही वाटत नाही का? या देवळात अमुकला बंदी, तमुकने जायचे नाही, यासाठी अनेक आंदोलने झाली पण देवेंद्र फडणविसांनी देवळात जाऊन देवाचे दर्शन घेऊ नये हासुद्धा कुणाच्या आंदोलनाचा भाग असू शकतो, हे पाहून आश्चर्य वाटते. आपल्या अनेक मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे, त्यापैकी एक मागणी अशीही आहे की, मुस्लीम समाजाने मागितलेल्या आरक्षणाच्या मागण्याही मान्य कराव्यात. असो मात्र मुख्यमंत्र्यांना विठोबाचे दर्शन घे देणार नाही ही देवदर्शन बंदी अनाकलनीय आहे.
जन्माला चिकटून आलेली जात, त्यानंतर ते जातीनिहाय काम, त्या जातीच्या वर्गीकरणावरून वगीर्र्कृत झालेला आलुतेदार बलुतेदार समाज. बापजाद्यांच्या हातातली कलाकुसर, कौशल्य पिढीजात वारसाला मिळायची. त्यामुळे मनात असो वा नसो, लोहाराच्या मुलाने लोहारकीच करायची आणि सुताराच्या मुलाने सुतारकीच करायची हे नशिबात लिहिलेलेच. प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी जातीनिहाय चिकटविलेल्या कामांचे कधीही समर्थन केले नाही, पण परदेशी टेक्नॉलॉजी आणल्यामुळे बारा बलुतेदारांचा रोजगार हिसकावून घेतले म्हणणार्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी बारा बलुतेदार पद्धतीचे समर्थन केले का? सकारात्मक परिवर्तन, विज्ञान-तंत्रज्ञान यानुसार बदलत्या जगाची लय स्वीकारल्याशिवाय आज तरी कोणत्याही देशाची प्रगती शक्य नाही. असे झाले म्हणून तसे झाले किंवा होईल हा बागुलबुवा बाळगून समाजाला चिंतातूर जंतू बनवणे, ही जातीअंताची लढाई आहे का? समाजाच्या अस्मितेच्या प्रश्नासोबतच आर्थिकतेचाही प्रश्न आहे. समाजाने नव्या तंत्रज्ञानाचे कौशल्य आणि पारंपरिक कुशलता यांचा समन्वय साधून पुढे जाणे गरजेचे आहे. पुन्हा त्यातही प्रयत्न हा हवा की, अर्थात एखाद्याला पारंपरिक कामाची आवड असेल तर ठीक आहे पण जन्मनिहाय जात आणि जातीनिहाय काम करण्याची कुणालाही तात्त्विक का असेना सक्ती नसावी. आता प्रश्न असा आहे की, पुरोगामी निधर्मी जातीअंत वगैरे दृष्टी असलेल्या प्रकाश आंबेडकरांची बारा बलुतेदार संकल्पना काय आहे?