बदलापूरजवळून पनवेलकडे जाण्यासाठी महामार्ग तयार करण्यात आला आहे. नव्याने विकसित होत असलेल्या या परिसरात नवनवीन गृहसंकुले तयार होत आहेत आणि त्यामानाने लोकसंख्या वाढत आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे. एमएमआरडीएच्या ताब्यात असलेल्या रस्त्याची मालकी नगरपालिकेकडे सोपविण्यात आली नाही. त्यामुळे पालिका या रस्त्याची दुरुस्ती करत नाही. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करतात, हाच मुद्दा पकडून नगरसेवक वडनेरे यांनी आज या रस्त्यावरून प्रवास करणार्या नागरिकांना झंडू बाम दिला आणि त्यांनी सुखरूप प्रवास केला म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या रस्त्यावरून अवजड वाहने जातात. खड्ड्यांमुळे एखादे वाहन उलटून अपघात होण्याची वाट तर एमएमआरडीए बघत नाही ना, असा सवाल वडनेरे यांनी उपस्थित केला.