आरावेला धाब्याचे घर पडल्याने दोन्ही चुलत बहिणींचा मृत्यू
शिंदखेडा, १९ जुलै :
तालुक्यातील आरावे रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक घराचा सरा मोडल्याने मातीच्या धाब्याचे लाकडी घर पडले. त्याखाली दबून १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरावे ता.शिंदखेडा येथे भटू भालचंद्र देशमुख(वाणी) रा.शेवाडे हे गेल्या पंधरा वर्षापासून आरावे येथे राहत होते. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांचे घर अचानक घराचा लाकडी सरा तुटल्याने घर पडले. त्यात त्याची शिंदखेडा एस.एस.व्ही.पी .एस. कॉलेजात एस.वाय. बी. ए. च्या वर्गात शिकणारी मुलगी रुपाली भटू देशमुख (वय १९) व आरावे येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी पुतणी धनश्री सुपडू देशमुख (वय १५) या दोघींचा मातीच्या ढिगार्या खाली दबल्याने मृत्यू झाला. भटू देशमुख आणि त्यांच्या पत्नी निर्मलाबाई या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांना अधिक उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. भटू वाणी मुळचे शेवाडे ता.शिंदखेडा येथील राहणारे असून शेतमजुरी करन आपला उदरनिर्वह करण्यासाठी आरावे येथे राहत होते. मयत पुतणी धनश्री हिची आई वारली असल्याने ती काकाकडे शिक्षण घेत होती.
दोंडाईचाहून मुकादम मागवलाय
१५०० रु. द्यावे लागतील...
दरम्यान दोन्ही बहिणीचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सकाळी आणले.े नवीनच रुजू झालेल्या महिला डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. त्यात त्यांनी मयताचे काका भगवान देशमुख यांना शवविच्छेदन गृहाजवळ बोलवून सांगितले की ‘आम्ही शवविच्छेदन करण्यासाठी दोंडाईचाहून स्वीपर मागवला आहे, त्याला एका शवविच्छेदनाचे ७५० रु (एकूण १५००) द्यावे , कारण असे घाण काम कोणी करत नाही’ यावर हे काम कुणाचे?...शासन आरोग्य सेवेवर कोट्यवधी रु. खर्च करीत असताना हे शोषण कशासाठी?...असा प्रश्न तेथील उपस्थितांना पडला. या वेळी मयताच्या शिक्षक, प्राचार्य, व मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अश्रूंचे ’निखारे‘ झाले...
आधीच शोकाकूल परिवाराकडे पैशांची मागणी झाली.‘अश्रू आटून त्यांचे धगधगते निखारे व्हावे’ असा हा प्रकार ठरला. मृतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा किळसवाणा प्रकार थांबवावा,शासनाने मुकादम (स्वीपर) नेमावा, अशी वाजवी, रास्त मागणी संतप्त जनतेकडून होत आहे.