मालेगाव : धुळे पाठोपाठ आता जळगावात देखील 'मुले पळवणाऱ्या टोळी'च्या अफवेचे लोण पसरले आहे. मुले पळवणारी टोळी समजून जळगावातील मालेगाव येथे तीन जणांना स्थानिकांकडून खोलीमध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. या तिघाजणांची जळगाव पोलिसांनी आज सुटका केली असून सध्या हे तिघे जण सुखरूप आहेत.
मालेगावातील आझादनगर येथे ही घटना घडली आहे. मुले पळवण्यासाठी म्हणून हे लोक मालेगावात असल्याच्या अफवेवरून स्थानिक नागरिकांनी या तिघांना आझादनगरमधील अली अकबर हॉस्पिटलजवळील एका खोलीमध्ये डांबून ठेवले होते. तसेच त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ यावर कारवाई करत, या तिघांची याठिकाणाहून सुटका केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये 'मुले पळवणाऱ्या टोळीची' अफवा पसरली आहे. या अफवेमुळे काल धुळे येथे पाच निर्दोष नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मुले पळवण्यासाठी म्हणून गावात आल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी या पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या केली होती.