मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या या प्रतिमेवर काँग्रेसने आज एक मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधींचा जमीन घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने आजे केला आहे. याबाबत रणदीप सुरजेवाला यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने हा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोची १ हजार ६०० कोटींची जमीन ३ कोटीच्या कवडीमोल किमतीत दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसने म्हटले, की पॅरोडाईज बांधकाम व्यावसायिकावर मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष कृपा होती. सरकारने २४ एकर जमिनीचा घोटाळा केला असून जमिन घोटाळ्यात प्रसाद लाड यांचाही हात आहे. तसेच घोटाळ्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश असून सर्वोच्च पातळीवरील व्यक्तीच्या कृपेशिवाय हा घोटाळा होऊच शकत नाही. यावेळी काँग्रेसने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कररण्याचीही मागणी केली.
येत्या काळात महाराष्ट्रात असलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही नवीन खेळी तर नाही ना असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आला असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आता यावर काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.