कार्यालयातर्फे आजपासून तीनदिवसीय विशेष मोहीम
जळगाव :
विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान न होऊ देता जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली लावण्यासाठी समितीने सोमवारपासून तीनदिवसीय विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार प्रकरणापैकी १४०० प्रकरणात त्रुटी असून ८०० विद्यार्थ्यांना जात पडताळणी विभागाने फोन करून प्रकरणे निकाली काढणार असल्याचे समितीच्या अध्यक्षांनी सांगितले.
गेल्या महिन्यात दहावीसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल लागले होते. निकाल घोषित झाल्यानंतर जातपडताळणी प्रकरणे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. जातपडताळणी सक्तीचे असल्याने विद्यार्थ्यांचे सुरुवातीलाच अतोनात हाल झाले. त्यांना वारंवार जात पडताळणी कार्यालयाच्या वार्या कराव्या लागून विद्यार्थ्यांना वेळ खर्ची करावा लागला होता. कार्यालयात कर्मचार्यांअभावी विद्यार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता करतांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. कार्यालयात संबंधितांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गही हतबल झाले होते. वेळोवेळी होणार्या अशा स्थितीमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खचत जावून प्रवेशापासून वंचित रहावे लागते की काय, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
जात पडताळणी समितीकडे प्रकरणे दाखल करतांना चेक लिस्टनुसार सुरूवातीलाच अर्ज स्विकारावे असे विद्यार्थ्यांनी वारंवार समितीला सांगितले होतेे. समिती प्रकरणे जमा करतांना विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात नमूद करत असते. प्रकरण गहाळ झाल्यास समिती जबाबदार राहणार नाही, असे अर्जात नमूद केले जाते. यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात प्रवर्गाचा प्रवेश रद्द होऊन काही विद्यार्थ्यांना तो खुल्या वर्गात करावा लागत आहे. समितीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
बार्टी विभागातील समतादूताच्या सहकार्यामुळे हाती घेतली मोहीम
सध्या दीड वर्षापासून जात पडताळणी विभागाचे जळगावात स्थलांतरित झाले आहे. कार्यालयात मनुष्यबळाचा अभावासह संगणक सिस्टिम अद्ययावत नाही. जात पडताळणी प्रकरणात येणार्या त्रुटी ह्या संदेशाद्वारे अद्ययावत नाहीत. ती लवकरच अद्ययावत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून समितीने बार्टी विभागाच्या समतादूताच्या सहकार्याने ही विशेष मोहिमेतून निकाली लावणार आहे.