बळीराजा जलसंजीवनी योजना : केंद्राकडून १३,६५१ कोटी मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |

राज्यातील ९१ जलसिंचन प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार

 
 
नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजने अंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून १३ हजार ६५१ कोटींचा निधी मंजूर झाला असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
 
 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर आज परिवहन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या निधीपैकी केंद्र शासनाकडून ३ हजार ८३१ रूपये केंद्राकडून देण्यात येणार आहेत तर उर्वरीत ९ हजार ८२० कोटी नाबार्ड कडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.
 
 
 
 
१४ जिल्हयांतील ९१ प्रकल्पांसाठी १३ हजार ६५१ कोटींचा निधी
 
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्या ग्रस्त भागासाठी ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजना तयार केली आहे. आजच्या कॅबीनेटच्या निर्णयाने विदर्भातील ६, मराठवाडयातील ५ तर उर्वरीत ३ अशा राज्यातील एकूण १४ जिल्हयांमधील ९१ जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने १३ हजार ६५१ कोटींच्या निधीस मंजुरी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
 
 
विदर्भातील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी
 
विदर्भातील अमरावती जिल्हयातील १८ प्रकल्प, वाशिम जिल्हयातील १८, यवतमाळ जिल्हयातील १४, बुलडाणा जिल्हयातील ८ , अकोला जिल्हयातील ७ आणि वर्धा जिल्हयातील १ अशा एकूण ६६ जलसिंचन प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 
 
 
४ वर्षात राज्यातील जल सिंचन प्रकल्पांसाठी १ लाख १५ हजार कोटी


राज्यातील अर्धवट जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या ४ वर्षात केंद्र शासनाने १ लाख १५ कोटींचा निधी दिला असून यामुळे राज्यातील ११ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील २६ प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी, पिंजाळ-दमनगंगा आणि तापी-पार-नर्मदा या नदीजोड प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी आणि बळीराजा जलसंजीवणी योजनेसाठी १३ हजार ६५१ कोटींचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
मराठवाडयातील १७ प्रकल्पांसाठी १ हजार २३ कोटी
 
मराठवाडयातील ५ जिल्हयांतील १७ प्रकल्पांसाठी १ हजार २३ कोटी ६३ लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. या विभागातून औरंगाबाद जिल्हयातील ५ प्रकल्प, जालना जिल्हातील ६ , नांदेड जिल्हयातील २ लातूर जिल्हयातील ३ आणि बीड जिल्हयातील १ अशा एकूण १७ प्रकल्पांचा समावेश आहे.
 
 
राज्यातील ८ मोठे व मध्यम प्रकल्पांसाठी ९ हजार ५२१ कोटी
 
राज्यातील ८ मोठे व मध्यम प्रकल्पांसाठी ९ हजार ५२१ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यात सांगली जिल्हयातील टेंभु प्रकल्प, सातारा जिल्हयातील उर्मोडी, धुळे जिल्हयातील सुलवाडे-जांफळ, जळगाव जिल्हयातील शेळगाव आणि वरखेड-लोंढे, अकोला जिल्हयातील घुंगशी आणि पुर्णा बरॅज, बुलडाणा जिल्हयातील जीगाव या जल सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@